कोयनानगर – अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून सुटका करुन घेण्यासाठी कोयना धरणात पोहायला गेलेला गाडखोप गावातील अर्जुन शरद कदम (वय 22) धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला आहे.
धरणात पोहणे गाडखोप गावातील युवकांच्या जीवावर बेतले आहे. कोयना धरणात सध्या गाळमिश्रीत पाणी आहे. बेपत्ता झालेल्या युवकाला शोधण्याचे काम सुरु आहे. यामुळे गाडखोप गावावर शोककळा पसरली आहे.
प्रखर उन्हामुळे कोयना नदीवर पोहणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कोयना काठ कायमच हाऊसफूल असतो. कोयना धरणाच्या उजव्या तीरावर असणाऱ्या गाडखोप या गावातील ४- ५ युवक कोयना धरणाच्या पात्रात बाजे या ठिकाणी पोहायला गेले होते.
ते पोहत असताना त्यातील अर्जुन कदम हा युवक खोल गाळात अडकून गायब झाला आहे. हा युवक गाळात रुतून बसला असण्याची शक्यता आहे. या युवकाला शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेची नोंद कोयना पोलीस ठाण्यात झाली आहे. सपोनि नवनाथ गायकवाड तपास करत आहेत.