नवी दिल्ली – चंदीगढ महापौर निवडणुकीच्या प्रकरणातील सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजयी घोषित केले. निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी जी ८ मते अमान्य ठरवली होती ती मतेही सर्वोच्च न्यायालयाने आज वैध ठरवली आहे.
न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे संयुक्त उमेदवार देणाऱ्या आप आणि कॉंग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचे उमेदवार असणाऱ्या कुलदीप कुमार यांना ३० जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मनोज सोनकर यांना १६ मते मिळाली होती व त्यांना महापौर घोषित केले गेले होते. निवडणुकीत ३६ जण (३५ नगरसेवक आणि १ खासदार) मतदार होते. यात आपच्या उमेदवाराला मिळालेल्या २० मतांपैकी ८ मते बाद ठरवण्यात आली होती. या निर्णयाच्या विरोधात आपने न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने आज आपला निकाल दिला आहे.
चंदीगढ महापालिकेत भाजपचे १४ नगरसेवक आहेत. संख्याबळ पाहता भाजप नगरसेवकांची संख्या जास्त आहे. १३ नगरसेवकांसह आम आदमी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर तर ७ नगरसेवकांसह कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक आहे. येथे महापौर पदाच्या निवडणुकीत स्थानिक खासदारालाही मतदानाचा अधिकार आहे. भाजपच्या किरण खेर येथे खासदार आहेत.
महापौर होण्यासाठी १९ ही संख्या गाठणे आवश्यक होते. भाजपकडे एकूण १५ मते होती. शिरोमणी अकाली दलाचे एक मत जोडून भाजपकडे १६ मते होतात. ३० जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला एवढीच मते मिळाली. तर दुसरीकडे कॉंग्रेस आणि आपची एकत्रित मते होती २०. यातील ८ मते अवैध ठरवली गेली. यामुळे कुलदीप कुमार यांच्याकडच्या वैध मतांची संख्या १२ राहीली व भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषित केले गेले.
दरम्यान, केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आणि भारतीय लोकशाहीमुळे एक गरीब घरातील मुलगा महापौर झाला आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आपली लोकशाही आणि संस्थांची निष्पक्षता वाचवावी लागणार आहे अशी प्रतिक्रिया आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. भाजपने ३६ मतांमधील २५ टक्के मते चोरी केली. ९० कोटींतील किती मते ते चोरू शकतात याचा विचार करा असेही ते म्हणाले.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, कॉंग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल आणि सचिन पायलट यांनीही या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला आहे व हा लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा उघड झाला आहे. अगदी लहान महापौर पदाची निवडणूक जिंकण्यासाठीही त्यांनी बेइमानी केली. त्यांचा आणि पीठासीन अधिकाऱ्यांचा हा अप्रामाणिकपणा उघड झाला आहे. घोडेबाजार देशातील लोकशाही प्रक्रियेला प्रभावित करत असल्याचे सुप्रीम कोर्टानेही म्हटले आहे.
– सौरभ भारद्वाज, आप नेते
मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. हा चंदीगढच्या लोकांचा आणि इंडिया आघाडीचा विजय आहे. भाजपचा पराभव होउ शकतो हे आजच्या निकालाने अधोरेखित झाले आहे. आम्ही एकजूट राहीलो तर त्यांचा पराभव करू शकतो.
– कुलदीप कुमार, चंदीगढचे महापौर