नवी दिल्ली: लॉकडाऊन उठवताना आणि देशाचे अर्थकारण पुन्हा सुरू करताना खूप हुशारी दाखवायला लागेल. मात्र त्याचबरोबर लोकांना जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर नागरिकांना रोजगार मिळायला हवा, असे रिझर्व बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. देशातील सर्व लोकांना दीर्घकाळ सहाय्य करण्याची देशाची क्षमता नाही, असेही राजन म्हणाले. कोविड-19 चा देशाच्या अर्थकारणावर झालेल्या परिणामाबाबत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी आपले मत मांडले.
सध्याच्या परिस्थितीत गरिबांना मदत करण्यासाठी किती पैसे लागतील, असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना राजन यांनी देशाच्या सध्याच्या जीडीपीचा विचार करता 65 हजार कोटी रुपये लागतील, असे सांगितले.
देशासमोर मोठे आव्हान असताना एकवाक्यता नसणे देशाला परवडणार नाही. लॉकडाऊन उठवताना आपल्याला खूप हुशारी दाखवावी लागेल. उपाययोजनेच्या स्वरुपात आपल्याला हे काम करावे लागेल. आपला देश तुलनेने गरीब आहे. लोकांना अल्प उत्पन्नापासूनच सुरुवात करावी लागते. त्यांना रोजगार मिळण्यासाठी लवकरात लवकर उत्पन्नाचे साधन मिळायला हवे, असेही राजन म्हणाले. कायमस्वरुपी लॉकडाऊन ठेवणे खूप सोपे आहे. मात्र तसे करणे अर्थकारण अस्थिर करण्यासारखे होईल, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्याबरोबरचा राजन यांचा हा संवाद कॉंग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया हॅन्डलवर सुरू होता. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवरील देशाच्या अर्थकारणासंदर्भात राहुल गांधी यांच्या प्रश्नांना राजन यांनी दिलेल्या उत्तरातून मौलिक मार्गदर्शनही केले आहे.
पायाभूत सुविधांमुळे नागरिकांना जोडले जाते आणि त्यातूनच संधीही उपलब्ध होते. मात्र विभाजन आणि द्वेषभावनेमुळे लोकांमधील संपर्क तुटतो आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राजन यांनी राहुल गांधी यांचे हे मत मान्य केले. सामाजिक सौहार्द निश्चितच असायला पाहिजे. त्यासाठी आपण व्यवस्थेचा भाग आहोत, अशी भावना लोकांमध्ये असायला पाहिजे, असेही राजन म्हणाले.