पुणे : राजस्थानातील कोटा येथे प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील मुलांना आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होत आहेत. त्याच धर्तीवर पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 2 हजार 386 उमेदवारांना मूळ गावी जाण्यासाठी विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.
पुणे शहरामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी राहतात. परंतु सध्या लॉकडाऊन घोषित केल्यामुळे यातील अनेक मुले व मुली येथेच अडकले आहेत. हॉटेल, मेस बंद असल्याने त्यांच्या जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यातील हजारो उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोफत जेवणाचे डबे पोहचवत आहे. सामाजिक संस्थेचेही मदतकार्य चालूच आहे.
परंतु अनेक विद्यार्थी आर्थिक विवंचनेत आणि विशेषतः मुली मानसिक तणावाखाली आहेत, असे “मनविसे’चे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले. पुणे शहरामध्ये अडकलेल्या स्पर्धा परीक्षासह इतर एकूण 2386 विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली यादी परिवहन मंत्र्यांना निवेदनाद्वारे सादर केली आहे. पुण्यात अडकलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मूळ गावी परत जाण्याची विशेष बसेसची व्यवस्था करावी, अशी मागणी कल्पेश यादव यांनी केली आहे.
दरम्यान, राजस्थान मधील कोटा इंजिनिअरिंग व मेडिकलच्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी राहत आहेत. परंतु सध्यालॉकडाऊन घोषित केल्याने यातील अनेक विद्यार्थी इथेच अडकले आहेत. अशा विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना परत आणण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने विशेष बसेसची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारकडून विशेष प्रयत्न करत कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांकरिता एसटी बसेसची व्यवस्था करत विद्यार्थ्यांना सोडविणेचे विशेष नियोजन होत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे.