आळंदी – श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुखपदी योगी निरंजन नाथ यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी (29 मार्च 2024) श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त मंडळाची मासिक बैठक संपन्न झाली. या बैठकीत सन 2024च्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी (आळंदी-पंढरपूर-आळंदी) पालखी सोहळा प्रमुख म्हणून संस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ उपस्थित होते, अशी माहिती देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. दरम्यान, योगी निरंजन नाथ यांनी 15 वर्ष आळंदी-पंढरपूर पायी वारी केली आहे. (Yogi Niranjan Nath was elected as the head of Shri Dnyaneshwar Maharaj Ashadhi Wari Palkhi Sohala 2024)
29 जूनला प्रस्थान ?
दरवर्षी ज्येष्ठ वद्य अष्टमीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होत असते. त्यानुसार मागील वर्षी 11 जूनला प्रस्थान झाले होते. तर पालखी सोहळा 28 जूनला (आषाढ शु. दशमी) पंढरपुरात मुक्कमी पोहोचला होता. 29 जूनला आषाढी एकादशी होती. यावर्षी 17 जुलैला आषाढी एकादशी असून ज्येष्ठ वद्य अष्टमी 29 जूनला माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान होईल. पहिला मुक्काम हा आळंदी येथेच असेल. तर 30 जूनला पालखी पुणे मुक्कामी असेल.
“आळंदी – पंढरपूर आषाढी पायी वारी सोहळा ही जगातील सर्वात मोठी पायी यात्रा आहे. पालखी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. गेल्या वर्षी वारकऱ्यांना उन्हामुळे खुप त्रास झाला होता. तो अनुभव विचारात घेता यावेळी सरकारकडे पालखी मार्गाच्या बाजुला तात्पुरते विसावा मंडप उभारण्याची मागणी केली जाणार आहे. सर्व प्रथा परंपरेनुसार सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने वारकऱ्यांना कुठलीही अडचण न येऊ देता उत्साहात सोहळा पार पाडण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार.” – योगी निरंजन नाथ