पुणे – खडकवासला प्रकल्पातील चार धरणांच्या परिसरामध्ये सोमवारीही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून 5 हजार 136 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांत मिळून सुमारे 21 टीएमसी म्हणजे 72 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वर्षभराचे टेन्शन मिटले आहे.
मागील चार दिवसांपासून धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी दिवसभरात पानशेतमध्ये 66 मिमी, वरसगावमध्ये 70 मिमी, टेमघरमध्ये 60 मिमी आणि खडकवासला मध्ये 9 मिमी पाऊस झाला. पानशेतमध्ये 8.50, वरसगाव-8.33, टेमघर-2.16 तर खडकवासला धरणात 1.97 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. सोमवारी दुपारी 3 हजार 424 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने विसर्ग वाढविण्यात आला. खडकवासला धरण पूर्ण भरल्याने कालव्याद्वारे 1 हजार क्युसेकने, तर मुठा नदीत 5 हजार 136 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.