पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात पाच-सहा दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात 96 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरवासियांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. तर गुरुवारी सायंकाळी धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला होता. पावसाचा जोर वाढल्यास पवना नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता समीर मोरे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळातील काही भागाला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. पवना नदीत पाणी सोडून महापालिका रावेत येथील बंधाऱ्यातून पाणी उचलते. पाणी निगडी, प्राधिकरणात जल शुध्दीकरण केंद्रात शुध्द करून शहरात वितरित केले जाते. सध्या शहराला महापालिका 510 तर एमआयडीसीकडून 30 एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे. शहराला गेल्या अडीच वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.
यंदा उन्हाळा कडक होता. तसेच पावसाळा सुरू होण्यास बराच उशीर लागल्याने धरणातील पाणीसाठा 17 टक्यांवर आला होता. जून महिना संपला तरी दमदार पाऊस पडत नसल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. त्यानुसार महापालिकेने आणखी पाणी कपातीचे नियोजन केले होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीपातळी सातत्याने वाढत गेली.
त्यानंतर पावसाने तब्बल 8 ते 10 दिवस विश्रांती घेतल्याने धरणातील पाणीसाठा पुन्हा कमी होऊ लागला होता. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून सर्वत्र वरूणराजाचे आगमन झाले. धरणातील पाणी पातळी वाढत गेली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 ऑगस्टपूर्वी शंभर टक्के भरणार आहे. गुरूवार सायंकाळपर्यंत धरणात 95.80 टक्के पाणीसाठा झाला होता.
गुरुवारी सायंकाळपर्यंत पवना धरणात 95.80 टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी दिवसभर फक्त36 मिमी पाऊस झाला. पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल.
– समीर मोरे,शाखा अभियंता, पवना धरण