लंडन(ओव्हल) :- कसोटी विश्वविजेतेपदासाठी आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत रंगणार आहे. ओव्हलच्या मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने असतील.या सामन्यासाठी भारतीय संघानं कंबर कसली आहे.
भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. यापूर्वी भारतानं 2021 मध्येही या स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळला होता. त्यानंतर साउथॅम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून आठ विकेट्सनी पराभव झाला होता. यंदा मात्र भारतीय संघाकडे मागचा पराभव विसरून WTCच्या ट्रॉफीवर कब्जा करण्याची सुवर्णसंधी आहे.
कसोटी विश्वविजेतेपदासाठीच्या अंतिम सामन्यास काहीच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल(Toss) हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. (India won the toss and elected to field) कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाच्या संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघानं लंडनच्या ओव्हल मैदानावर 38 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघानं 14 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत. ही कामगिरी पाहता या मैदानावरील दोन्ही संघांचा रेकॉर्ड फारसा खास नाही.अशातच दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहे. त्यापैकी ऑस्ट्रेलियाच्या संघानं 44 तर भारतीय संघानं केवळ 32 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघापेक्षा ऑस्ट्रेलियाचं पारडं काहीसं जड आहे.