नवी दिल्ली -टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकून 10 वर्षे झाली आहेत. 2013 सालानंतर भारतीय संघाने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत धडक मारली असली तरी विजेतेपदाचे स्वप्न गेल्या दहा वर्षांपासून अपूर्णच राहिले आहे. मात्र, 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून हा दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाला मिळणार आहे. यादरम्यान कोच राहुल द्रविडला डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी आयसीसी ट्रॉफीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी द्रविडने याबाबत भाष्य केले.
पत्रकार परिषदेत आयसीसी ट्रॉफीच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल द्रविड म्हणाला, “आम्ही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी कोणतेही दडपण घेत नाही. यात आम्ही यशस्वी झालो तर सर्वांनाच आनंद होणार आहे. मात्र, बाकीच्या गोष्टी पाहिल्यावर लक्षात येते की हे दोन वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे.
द्रविड पुढे म्हणाले, “अनेक गोष्टींमध्ये यश मिळवल्यावरच तुम्ही इथपर्यंत पोहोचता. त्यामुळे आमच्याकडे अनेक पॉजिटीव्ह गोष्टी आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मालिका जिंकणं, इथे मालिका ड्रॉ करणं, प्रत्येक ठिकाणी मोठी प्रतिस्पर्धा करणं या टीमला योग्यप्रकारे जमतं. या गोष्टी फक्त इतिहास बदलणार नाहीत की, तुम्ही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाहीय.”
रहाणेच्या पुनरागमनाबाबत द्रविड म्हणाला, “सर्वप्रथम त्याची उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्वाची आणि सकारात्मक आहे. शिबिरात काही दुखापती झाल्या होत्या, त्यामुळे त्याला संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. हे आमच्यासाठी चांगले आहे. तो एक दर्जेदार खेळाडू आहे. इंग्लंडमध्येही त्याने अनेकदा चांगले प्रदर्शन केले आहे.