पुणे – राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे (एनएचएम) कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या 25 ऑक्टोबरपासून आंदोलन पुकारले आहे. मात्र, राज्य सरकार याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नाही.
त्यामुळे एनएचएमच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू ठेवत सोमवारी पुणे जिल्हा परिषदेसमोर जागरण गोंधळ करत निषेध आंदोलन केले. या आंदोलनात पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अकोला या चार महापालिकेचे “एनएचएम’ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाची अट शिथिल करावी. आरोग्य विभागातील रिक्त जागांपैकी 30 टक्के जागा या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवून त्यांचे टप्याटप्याने समायोजन करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. निर्णय न झाल्यामुळे कामबंद आंदोलन यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी-कर्मचारी समायोजन कृती समितीचे राज्य समन्वयक हर्षल रणवरे यांनी सांगितले.
डॉक्टर, नर्सेस, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकारी, असे एकूण 2750 ग्रामीण भागातील आणि पुणे-पिंपरी चिंचवड मालिकेतील 1400 कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला आहे.