नवी दिल्ली – भारतीय सशस्त्र दलांच्या जवानांनी गलवान खोऱ्यामध्ये आणि अलिकडेच अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये दाखवलेले शौर्य आणि धाडसाचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतील, अशा शब्दांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh ) यांनी शनिवारी भारतीय जवानांचे कौतुक केले आहे.
पाकिस्तानच्या महिला मंत्र्याची भारताला अणुबॉम्बची धमकी
“फिक्की’तील कार्यक्रमामध्ये संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी जागतिक समृद्धीसाठी भारत जागतिक महासत्ता बनण्याच्या तयारीत असल्याच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला. दुसऱ्या देशांवर वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही देशाची एक इंच भूमीही हडपण्यासाठी भारताला जागतिक महासत्ता व्हायचे नाही, असेही राजनाथ सिंह सीमेवरील चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देताना म्हणाले.
चीनच्या सीमेवरील घटनांवरून राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीलाही राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या लष्कराचा धोका भारत सरकार कमी लेखत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर आम्ही कधीही कोणत्याही विरोधी नेत्याच्या हेतूबद्दल शंका घेतलेली नाही. केवळ धोरणाच्या अनुषंगाने प्रतिवाद केला आहे.
राजकारण केवळ सत्यावर आधारलेले असायला हवे. असत्याच्या आधारावर दीर्घकाळ राजकारण केले जाऊ शकत नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले. समाजाला सत्याच्या मार्गावर नेण्याच्या प्रक्रियेलाच “राजनिती’ म्हणतात. कोणाच्याही हेतूंबद्दल शंका घेण्याचे कारणच आपल्याला समजत नाही, असेही राजनाथ सिंह म्हणाले.