पिंपरी, दि. 16 – पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र आजही नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. चिखली, तळवडे परिसरातील मुख्य रस्त्यावर सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे.
देहू-आळंदी रोडवरून वारकऱ्यांच्या पायी दिंड्या नेहमी जात असतात. या दिंड्यामध्ये महिला वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने देहू-आळंदी रस्त्यावर कायमस्वरूपी सुलभ शौचालय निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी अनेकवेळा केली होती. परंतु, प्रशासनाने अद्याप याकडे लक्ष न दिल्याचे दिसून येत आहे.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीमध्ये प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे स्वच्छतागृह उभारले जातात. यात्रा संपल्यानंतर ते काढून घेतले जातात. त्यामुळे देहू-आळंदी तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्यावर महिला व पुरुषांसाठी कायमस्वरूपी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची मागणी केली जात आहे.
येथील औद्योगिक परिसरात हजारो महिला कामगार काम करतात. या महिलांना दूरवरून प्रवास करून कामावर यावे लागते. महिला कामगार बसने प्रवास करून कामावर ये-जा करत असतात. परंतु, या परिसरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करण्यात यशस्वी होत असलेले पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छतागृहाच्या बाबतीत काहीसे उदासीन असल्याचे दिसत आहे. शहरातील अनेक ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहात पाण्याची सुविधा नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे स्वच्छतागृहात मुबलक पाणीसाठा व नियमित स्वच्छता ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.