गुवाहाटी – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा गुरूवारी भाजपशासित आसाममध्ये दाखल झाली. त्यावेळी सरकारी योजनेच्या लाभार्थी बनण्यासाठी जमा झालेल्या महिलांनी राहुल यांना भेटण्यासाठी चक्क रांगा सोडून त्यांच्याकडे धाव घेतली.
आसाममधील भाजप सरकारने महिला बचत गटाच्या सदस्यांसाठी लखपती भगिनी योजना आणली आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागातील ४० लाख महिलांना व्यवसायसंधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संबंधित योजनेच्या लाभार्थी बनण्यासाठी महिलांना अर्ज भरून द्यावे लागणार आहेत. त्या अर्जांचे वितरण पंचायत कार्यालयांतून गुरूवारपासून सुरू करण्यात आले.
ते अर्ज मिळवण्यासाठी जोरहाट जिल्ह्यातील केंद्रासमोर महिलांनी रांगा लावल्या होत्या. त्यावेळी तिथून राहुल यांच्या वाहनांचा ताफा जात होता. त्यामुळे उत्साहाच्या भरात रांगा सोडून अनेक महिलांनी राहुल यांना अभिवादन करण्यासाठी रस्त्याकडे धाव घेतली. त्यांची भेट घेण्यासाठी राहुल बसमधून खाली उतरले.
महिलांसमवेत छायाचित्रे काढण्याचा आग्रह राहुल यांनी पूर्ण केला. त्यांनी संबंधित महिलांची ख्यालीखुशाली विचारली. दरम्यान, राहुल यांच्या यात्रेला अधिक फोकस मिळू नये या उद्देशातून आसाम सरकारने योजनेचे अर्ज वितरण यात्रेच्या काळातच सुरू केल्याचा दावा कॉंग्रेसच्या आसाम शाखेने केला.