पिरंगुट – हुतात्मा नाग्या महादू कातकरी या क्रांतीकारकाच्या स्मृतीदिनानिमित्त मुळशी तालुक्यात आदिवासी बांधवांसाठी आहोरात्र झटणाऱ्या सचिन सदाशिवराव आकरे या तरुणाने आपल्या गळ्यात नाग्या बाबांची प्रतिमा घालीत, पौड ते चिरनेर (जि. रायगड) हा 140 किलोमीटर, सलग आठ दिवस पायी प्रवास करुन वाटेत येणाऱ्या सर्व आदिवासी पाड्यांत समाजप्रबोधन केले.
चिरनेर (जि. रायगड) येथील अक्कादेवीच्या माळरानावर जंगल सत्याग्रह झाला होता. यामध्ये इंग्रज्यांच्या गोळीबारात आठ सत्याग्रहींना वीर मरण आले होते. त्यामध्ये आदिवासी-कातकरी समाजातील नाग्या महादू कातकरी या तरुणाला हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांच्याच स्मृतीदिना प्रित्यर्थ त्यांनी हा प्रवास केला.सचिन आकरे हे मुळ भुम (जि. उस्मानाबाद) या ठिकाणचे असुन ते मोटार मॅकेनिकल आहेत.
दहा वर्षांपूर्वी कामाच्या शोधात मुळशीत आले. परंतु, येथील कातकरी समाजाची परिस्थीती पहाता त्यांनी आदिवासी लोकांसाठी काम करण्याचे ठरविले. डोनेटोड सोसायटी, राष्ट्रीय सर्वांगीन ग्रामविकास संस्था, वनवासी कल्याण आश्रम, आदिवासी कल्याण संघ, संपर्क, जिवन संवर्धन फाऊंडेशन, गुरुकुल एज्युकेशन फाऊंडेशन यांसारख्या स्वयंसेवी संस्थांमार्फत मदत गोळा करुन ती मदत गरजु आदिवासींकडे ते पोहचवितात. आत्तापर्यंत त्यांनी अनेक आदिवासींच्या कागदपत्रे पुर्तता करुन त्यांच्यात प्रबोधन करण्याचे काम करीत आहेत.