अश्विन शुद्ध दशमी हा दिवस दसरा किंवा विजया दशमी म्हणून साजरा केला जातो. दसरा किंवा विजया दशमी हा वर्षातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक दिवस, या दिवशी कोणतेही कार्य करण्यासाठी मुहूर्त बघावा लागत नाही. दसऱ्यासंबंधी अनेक कथा आहेत. पांडवांचा 14 वर्षे वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास संपला आणि ते प्रकट झाले तो हा दिवस. एका कथेनुसार कुबेराने राजा रघूसाठी या वृक्षावर सुवर्ण मोहरांचा वर्षाव केला होता, तो हा दिवस. कौत्स नावाच्या एका शिष्याने वरतंतू नावाच्या आपल्या गुरूला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणा काय देऊ असे विचारले. गुरू म्हणाले, ज्ञान दान करायचे असते. त्याचे मोल नसते. तुम्ही शिकून शहाणे झालात यात मला गुरुदक्षिणा मिळाली. पण कौत्स अगदी हट्टालाच पेटला. तेव्हा गुरूजी म्हणाले, मी तुम्हाला 14 विद्या शिकवल्या, तेव्हा 14 कोटी सुवर्णमोहरा गुरुदक्षिणा द्या. आता इतक्या सुवर्णमोहरा कोठून आणणार? कौत्स राजा रघूकडे गेला. पण दान केल्याने राजाचा खजिना रिकामा होता. तेव्हा राजा रघूने देवांचा खजिनदार कुबेरावर स्वारी करण्याचे ठरवले, हे कळताच कुबेराने रघूच्या नगरीच्या वेशीवरील आपट्याच्या झाडांवर सुवर्ण मोहरांचा वर्षाव केला. त्यातील 14 कोटी मोहरा कौत्सला देऊन बाकी सर्व मोहरा प्रजेला वाटल्या, त्याची आठवण म्हणूनच दसऱ्याला सोने म्हणून आपट्याची पाने लुटतात. दसऱ्याच्या दिवशीच मराठे वीर सीमोलंघनासाठी बाहेर पडत असत.
विजय दशमी हा विजयाचा दिवस. मात्र हा विजय केवळ शत्रूवर पराक्रमाने मिळवलेला विजय नसतो, तर तो वैरावर प्रेमाने मिळवलेला विजय असतो, चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय असतो, सद्बुद्धीने दुर्बुद्धीवर मिळवलेला विजय असतो. आनंद, समाधान आणि त्याचबरोबर संपदा मिळवायची. शारदीय नवरात्र संपल्यावर दसरा येतो. शारदीय नवरात्र या नावातच या सर्व गोष्टींबरोबर दसऱ्याचे आणखी एक महत्त्व आहे, मात्र ते आजकालच्या जीवनात दुय्यम ठरू लागले आहे. सारा झगमगाट हा उत्सवावर, सोने लुटण्यावर आणि आता दांडिया खेळण्यावर केंद्रित केला आहे. गणपती उत्सवानंतर येणारा हा उत्सव गणपती उत्सवाप्रमाणेच थाटामाटात आणि मोठ्या झगमगाटात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी तर गणपती उत्सवासाठी उभारलेले मंडप हे नवरात्र उत्सवासाठी तसेच ठेवले जातात. तसेच डेकोरेशन, लायटिंग आणि कार्यक्रम अधिक दांडिया… पण दसरा म्हणजे शारदास्तवन, शारदेचे-विद्येच्या देवतेचे सरस्वतीचे पूजन.
अगदी लहानपणी आम्ही पाटीवर पेन्सिलीने सरस्वती काढायचो. 1 चा आकडा एकापुढे एक 7 वेळा, 9 वेळा वा 11 वेळा काढून त्यापासून सरस्वतीचे चित्र काढताना तेव्हा केवढा आनंद होत असे. आणि त्या पाटीबरोबरच वह्यापुस्तके, पेन्सील पेन यांचे पूजन करायचो. दसऱ्याला शस्त्रपूजन करतात आणि विद्येइतके सामर्थ्यशाली शस्त्र दुसरे कोणते आहे? आणि हे शस्त्र केवळ संहारासाठी नाही, तर ते समृद्धीसाठी आहे, सुखासाठी आहे. सर्वांच्या कल्याणासाठी आहे.
म्हणून दसऱ्याला सरस्वती पूजनाला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे. पूर्वी दसऱ्याच्या दिवशी लहान मुलांना पाटीवर श्रीगणेशा गिरवायला लावून त्याच्या शिक्षणाचा शुभारंभ करायचे. नंतर आणि अजूनही आमच्या घरात आणि शाळेतही दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीचे पूजन केले जाते. घरातील लहानथोर-सारेच या दिवशी विद्येची आणि आपापल्या शस्त्रांची पूजा करतात. आता त्यात संगणकाची म्हणजे कॉम्प्युटर भर पडली आहे. कॉम्प्युटर म्हणजे सर्व प्रकारच्या ज्ञानाचे भांडारच आहे. ज्याला जे आवडेल, जे झेपेल ते ज्ञान त्यातून सहजपणे मिळवावे. अगदी सकाळीच स्नान झाल्यानंतर सरस्वतीपूजन हेच सर्वात महत्त्वाचे काम. बाकी सर्व त्यानंतर.
आमच्याकडे पूर्वी संध्याकाळी सर्वजण मंदिरात सोने लुटण्यासाठी जात असत. आमच्या गावी सागर किनारी माउलीचे मंदिर होते. त्या मंदिरात संध्याकाळी भक्तजनांची प्रचंड गर्दी जमत असे. तेथे सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला, की नंतर मग आम्ही सोने वाटायला जायचो. एका वर्षी मी सोन्याला, म्हणजे आपट्यांच्या पानांना आदल्या दिवशी सोन्याचा वर्ख आणून लावला होता. दुसऱ्या दिवशी ती चमचमणारी सोनेरी पाने-प्रत्येकाला एकच पान-वाटताना मला मोठा आनंद आणि घेणाराला मोठे आश्चर्य-कौतुक वाटले होते.
अश्विनी महामुनी