सोलापूर – पालखीमार्गाचा विकास करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. ऊन,वारा, पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता आपल्या वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी महाराष्ट्र प्रत्येक पाऊलावर केंद्र सरकारसोबत आहे आणि हे वचन मी यानिमित्ताने देऊ इच्छितो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पंढरपूर पालखीमार्गाच्या कामाचे भुमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, वारीचे दर्शन मी स्वत: घेतले. मी काही वर्षांपूर्वी वारीची एरिअल फोटोग्राफी केली. यामाध्यमातून मी भक्तीसागर पाहिला. विठु माऊलीचे विराट दर्शन मी यात पाहिले. अनेक ठिकाणाहून पालख्या पंढरपूरला येतात. हे दृष्य पाहून अनेक नद्या सागराकडे धावत येतात, असं वाटतं.
वाखरी हे या पालख्यांची एकत्र येण्याची जागा. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर मार्ग मोठा करण्याचा निर्णय खुप महत्वाचा आणि मोठा आहे. तिथे सर्व पालख्या एकत्र येऊन भक्तीसागर निर्माण होतो. ऐहिक सुखाच्या मागे न लागता त्यापलिकडे जाऊन देहभान हरपून जाणारे वारकरी जेव्हा या मार्गावरून चालत असतात तेव्हा भक्तीसागराच्या या पाण्याला विठुनामाचा नाद असतो.
लाखो वारकऱ्याचे चरणस्पर्श होणारे हे रस्ते. वारीला जाता आले नाही तरी वारी करून आलेल्या वारकऱ्यांच्या पाया पडून आपण दर्शन घेतो. ही आपली परंपरा आणि ही आपली संस्कृती आहे. वारीने समाजाला दिशा, संस्कृती आणि संस्कार दिले. अनेक शतके परकीयांची आक्रमणे झेलून वारीची परंपरा या संप्रदायाने सुरु ठेवली. संस्कार देणाऱ्या या संप्रदायाचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, असेही ते म्हणाले.