रिंगण सोहळा कोठे कोठे असतो…
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी-
कराड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये कोट्यावधींची विकासकामे झाली आहेत. ही विकासकामे आम्ही जनतेपर्यंत घेवून जात असून सातारा जिल्ह्यातील जनतेचा कौलही भाजपच्याच पाठीशी राहील, याची आपणास खात्री आहे. त्यामुळे 2024 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून येईल. त्याचबरोबर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही भाजपचाच आमदार निवडून येणार असून या दोन्ही ठिकाणी कमळ फुललेले दिसेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ठाकरेंनी रथात बसून महाराष्ट्राचा गाडा हाकला का?
नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदींना मणिपूरकडे बघायला वेळ नाही आणि हे विदेश दौऱ्यावर निघालेत, अशी टीका केली होती. याचा समाचार घेताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जे मातोश्रीपासून वरळीपर्यंत गेले नाहीत, त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे का? हे त्यांनी पहावे. नरेंद्र मोदींनी करोनावरची लस बनवली, असे मी म्हटल्यावर ठाकरेंना राग आला. लसीकरणाचे कच्चे रॉ मटेरियल मोदींमुळेच भारताला मिळाले. 800 कोटी रुपये देऊन त्यांनी लस तयार करून घेतली. परंतु, असे असेल तर उद्धव ठाकरे हे घोड्याच्या रथामध्ये बसून महाराष्ट्राचा गाडा हाकत होते का? असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
येथील कल्याणी मैदानावर भाजपच्या महाजनसंपर्क अभियानांतर्गत भव्य लाभार्थी संमेलन व त्यांनतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. प्रवीण दरेकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसल, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी खा. अमर साबळे, माजी आ. मदनराव भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, डॉ. सुरेश भोसले, जेष्ठ नेते मदनराव मोहिते भरत पाटील, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, आदी. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपकडून महाजनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची नऊ वर्ष भारताच्या विकासगाथेला पुढे नेणारी ठरली आहेत. मोदींनी सामान्य माणसांना विकासामध्ये भागीदार केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जगाने योगाला मान्यता दिली. करोना कालावधीत संपूर्ण देशातील जनतेला दोन वर्ष मोफत अन्न-धान्य देण्याचा विक्रम नरेंद्र मोदींनी केला असून संपूर्ण जगणे त्यांचे कौतुक केले. सर्वसामान्यांना 25 लाख घरे दिली. आयुष्मान भारतच्या माध्यमातून 71 लाख जणांना लाभ मिळाला.
तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले. त्यानुसारच राज्य सरकारही आता सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहे. 41 लाख तरुणांना मुद्रा लोनच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे केले. चार लाख कोटींची कामे मोदींनी महाराष्ट्रात केली आहेत. पाच वर्षात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून महाराष्ट्रात समृद्धी आण्याचे काम झाले आहे. 2014 ते 19 दरम्यान 48 हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन व्यवस्था करण्याचे काम सरकारने केले आहे. परंतु, अडीच वर्षाच्या सरकारने शिन्चानासाठी एक पैसाही दिला नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, सिंचनाचा आढावा बैठकीत झालेल्या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, 2019 मध्ये राज्यातील सिंचनाची जी कामे ज्या स्थितीत होती. ती कामे आजही त्याच स्थितीत आहेत. मात्र, आमचे सरकार निधी उपलब्ध करून देत या सिंचन प्रकल्पांना गती देणार आहे. तसेच शेतकऱ्यांना एक रुपया भरून पिक विमा देण्यात येणार असून मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माध्यमातून तीन वर्षात दहा लाख वीस कनेक्शन देण्यात येणार आहे. आम्हाला जनतेचे हित जोपासायचे आहे. भ्रष्टाचार करून स्वतःच्या तिजोऱ्या भरायच्या नाहीत, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
माझ्या मागणीवरून ‘कृष्णा खोरे’ची निर्मिती
स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी कृष्णा खोरे महामंडळाची निर्मिती करण्याची विनंती आपण त्यांच्याकडे केली होती. त्याला त्यांनी तात्काळ मान्यताही दिली. परंतु, 40-45 वर्षे कॉंग्रेसचे राज्य असताना त्यांना हे शक्य झाले नाही. की त्यांना ते करायचे नव्हते? असा सवाल खा. उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
अतुलबाबांना आमदार झालेलं बघायचंय!
भाजपने युवा नेते अतुलबाबांवर देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी टाकल्यावर विद्यमान व त्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी लढा दिला. तसेच फडणवीस साहेबांनी टाकलेली प्रत्येक जबाबदारी अतुल बाबा सक्षमपणे निभावत असून फडणवीस साहेबांना येत्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अतुलबाबा भोसले यांना आमदार झालेलं पाहायचं, असे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.
साताऱ्यात भाजपचा खासदार आणायचाय
प्रास्ताविकात डॉ. अतुल भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भाजपने राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यासह कराड दक्षिणमध्ये सर्वाधिक कार्यक्रम देत फडणवीस साहेबांनी विविध विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून आणायचे काम आपल्याला करायचे असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.