नवी दिल्ली – करोनाकाळात अनेकजणांनी नोकऱ्या गमावल्या. तर काहीजणांना वेतन कपातीचा फटका सहन करावा लागला. मात्र, माहिती आणि तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘विप्रो’ने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांच्या कामाचे मोल जाणून वर्षभरात दुसऱ्यांदा वेतनवाढ देण्याचे विप्रोने ठरवले असून येत्या सप्टेंबरपासून 80 टक्के कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फायदा होणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात कंपनीने वेतनवाढ केली होती. यात सहायक व्यवस्थापक आणि त्याखालील कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्यात आली होती.
व्यवस्थापक आणि त्यावरील पदांसाठी 1 जून पासून वेतनवाढ केल्याची घोषणा करण्यात आली होती. करोना संकटाने कारखाना उद्योगाला झळ बसली तरी दुसऱ्या बाजूला देशातील आघाडीच्या आयटी सेवा पुरवठादार कंपन्यांनी मागील वर्षभर कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे.
अशी असणार वेतनवाढ –
- परदेशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 8 ते 9 टक्के वाढ करणार
- ऑनलाइन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5 ते 6 टक्के वेतनवाढ होणार
- चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ मिळणार
दरम्यान, विप्रो पाठोपाठ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) 4 लाख 89 हजर कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात वेतनवाढ दिली होती. तसेच इन्फोसिसने देखील जुलैपासून दुसऱ्यांदा वेतनवाढ देण्याची तयारी केली आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये नोकऱ्या धोक्यात आल्याचे अहवाल नुकताच जाहीर झाले होते. यात 30 लाख नोकऱ्या जातील असा दावा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर नॅसकाॅम या संस्थेने आयटी सेवा क्षेत्रात नोकऱ्या वाढतील, असा प्रतिदावा करण्यात आला होता. मात्र असे असताना विप्रो, टीसीएस, इन्फोसिस या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली आहे.