महाबळेश्वर – निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाबळेश्वर तालुक्याला बुधवारी (दि. 3) जोरदार वारे व मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे महाबळेश्वर, पाचगणीसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर विजेचे अनेक खांबही कोसळल्याने या भागातील वीज दोन दिवस गायब झाली. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणीतील जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांनी घरीच बसणे पसंत केले. करोनाच्या सावटाखाली असलेल्या तालुक्याला काल वादळी वारे व पावसाने चांगलाच तडाखा दिला. वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 85 किमी होता.
त्यात महाबळेश्वर येथील प्राथमिक शाळा क्र. 2, माखरिया हायस्कूलच्या इमारतीचे लोखंडी शेडवरील पत्रे उडून गेले. अंबिका नामदेव सोसायटीतील काही घरांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. शिंत्रे यांच्या घराचे पत्रे उडून गेले. नगरसेवक संजय पिसाळ यांनी या नुकसानीची पाहणी केली. बाजारपेठेतही अनेक दुकानांचे बोर्ड व शेडवरील पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडले. महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर काही ठिकाणी वृक्ष पडल्यामुळे वाहतूक बुधवारी विस्कळीत झाली होती. ही वाहतूक गुरुवारी पूर्ववत करण्यात आली.
तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील शहर व ग्रामीण भागातील नुकसानीची पाहणी करत असून आवश्यक तेथील पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी मंडलाधिकारी व तलाठ्यांना दिले आहेत. या आपत्तीत महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
महाबळेश्वर शहरात दहा ठिकाणी तर तालुक्यात 48 ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. मेटगुताड, किल्ले प्रतापगड, झांजवड, आढाळ, माचुतर, भोगवली, बिरवाडी, शिरवली आदी गावांमधील खांब कोसळल्याने तालुक्याचा वीजपुरवठा दोन दिवस बंद होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे 35 व दहा ठेकेदारांचे कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत असल्याचे कंपनीचे उपअभियंता रेड्डी यांनी सांगितले. दरम्यान, महाबळेश्वर येथे काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासांत 187.4 मिमी पावसाची नोंद झाली. आजअखेर एकूण 257.9 मिमी पाऊस झाला आहे.