नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात केवळ बारा कोटी डोस राज्यांना वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात रोज सरासरी केवळ 40 लाख डोसचेच वितरण होऊ शकणार आहे.
वास्तविक डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण पूर्ण करायचे असेल तर रोज किमान एक कोटी लोकांना लस दिली जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे जुलै महिन्यात लसीकरणाचे हे प्रमाण कमी होणार असल्याचे केंद्र सरकारच्याच माहितीवरून स्पष्ट होत आहे.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात लसीकरणाच्या संबंधात अलीकडेच जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यात जुलै महिन्यात केवळ 12 कोटी डोसचेच वितरण होऊ शकणार आहे. देशात 21 जूनपासून सर्वांना मोफत लस देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.
याची सुरुवात जोषात व्हावी म्हणून 21 जूनला सर्वांना मोठ्या प्रमाणात लस देण्यात आली पण नंतर मात्र त्याचा वेग कमी झाला. 1 जून ते 27 जून या अवधीत देशातील 10 कोटी 80 लाख लोकांना करोनाची लस देण्यात आली आहे.