दुबई -आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद जरी पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे असेल तरीही सुरक्षेच्या मुद्द्यावरून सध्या बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे सांगितले. अशा स्थितीत ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी बांगलादेश व श्रीलंका क्रिकेट मंडळांनी दर्शवली आहे.या भूमिकेला बांगलादेश व श्रीलंका क्रिकेट मंडळांनीही पाठींबा दिला आहे. अशा स्थितीत आशिया क्रिकेट समिती या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय संघ पाकिस्तानात आशिया करंडक खेळण्यासाठी आला नाही तर पाकिस्तानचा संघही भारतात एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा खेळण्यासाठी भारतात येणार नाही, अशी धमकी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा यांनी तसेच विद्यमान अध्यक्ष नजम सेठी यांनी दिली होती.
मात्र, त्यानंतर आशिया क्रिकेट समितीने या स्पर्धेतील भारताचे सामने अमिरातीत खेळवण्याची कल्पना मांडली होती व त्याला बीसीसीआयनेही तयारी दर्शवली होती. मात्र, आता सुरक्षेचा मुद्दा पुढे आला असून बीसीसीआयच्या भूमिकेला बांगलादेश व श्रीलंका मंडळाने पाठिंबा दिल्याने पाकिस्तानचे यजमानपदच जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.