रोहन मुजूमदार
पुणे – पुरंदर तालुक्यासाठी वरदान असलेल्या गुंजवणी प्रकल्पावरून शिवसेनेचे तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे आणि कॉंग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे या दोघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत; मात्र सध्या राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. तर शिवतारे आजारी असल्याने या प्रकल्पावर निवडणुकीनंतर एकही शब्द उच्चारला गेला नव्हता; मात्र रविवारी (दि. 13) आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषद घेत गुंजवणीचे पाणी पुरंदरला आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आगामी काळात पुरंदरचे आमदार जगताप व भोरचे आमदार थोपटे यांच्यात वाद होणार की, सत्तेत असल्यामुळे सुवर्णमध्य साधला जाणार हे लवकरच कळेल.
पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गुंजवणी प्रकल्पाकडे पाहिले जाते. या प्रकल्पासाठी शिवतारे यांनी अनेक खस्ता खाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करून दाखवणारच, असा विडा त्यांनी उचलला होता. तर गुंजवणी प्रकल्पातून केवळ पुरंदरसाठी उपसा योजनेच्या निविदा प्रसिद्ध करून यातून भोर, वेल्हे, हवेली तालुक्याला वगळल्याने प्रकल्पास तीव्र विरोध करण्यासाठी आमदार संग्राम थोपटेंच्या अध्यक्षतेखाली गुंजवणी पाणी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. गुंजवणी धरणाचे पाणी पुरंदरला देण्यास आमचा विरोध नाही; मात्र आमच्या शिवगंगा खोऱ्यातील शेतकऱ्यांना पिण्याचे आणि शेतीसाठी पाणी सर्वप्रथम मिळाल्याशिवाय गुंजवणीतील पाण्याचा एकही थेंब पुढे जाऊ देणार नसल्याचा इशारा आमदार संग्राम थोपटेंसह संघर्ष समितीने यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पावरून अनेकदा वादाच्या ठिणग्या पडल्या असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधी कायमच झडल्या आहेत.
आता पुरंदर-हवेलीचे कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप असून त्यांनीही गुंजवणीच्या पाण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी निवडणुकीच्या जाहिरनाम्यातही गुंजवणीचे पाणी पुरंदरला आणणार, असे नमूद केले आहे. त्यादृष्टीने त्यांनी कार्यवाही सुरू केली आहे. यात भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना विश्वासात घेतले आहे की नाही, यावर भाष्य केलेले नाही. त्यामुळे आगामी काळात हा प्रश्न उफाळून आला तर सत्ताधारीच एकमेकांची “री’ ओढताना दिसतील.
- महाविकास आघाडी नावालाच?
शिवसेनेचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे गुंजवणीच्या पाण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. गुंजवणीचे पाणी पुरंदरमध्ये आणणे म्हणजे त्यांचा “ड्रीम प्रोजेक्ट’ मानला जातो. गुंजवणीच्या प्रश्नाबाबत रविवारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक पार पडली, त्यात शिवसेनेचा समावेश नव्हता. दरम्यान, शिवतारे आजारी असल्याने आणि त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असल्याने ते उपलब्ध नव्हते. बैठकीला शिवसेनेचा एकही नेता किंवा पदाधिकारी नसल्याने स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी नावालाच आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
- आमदार थोपटे भूमिका बदलणार का?
आमदार संग्राम थोपटे यांनी हॅट्ट्रिक केली तरी त्यांना महाविकास आघाडीत मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील कॉंग्रेसचे भवन फोडले होते. आता परिस्थिती वेगळी असून गेल्या अनेक वर्षांपासून भोर-वेल्ह्याच्या जनतेच्या पाण्यासाठी लढा देणारे आमदार थोपटे सत्तेत असल्यामुळे पुरंदरला पाणी जाऊ देणार की पूर्वीच्या पाण्याच्या मुद्द्यावर ठाम राहणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.