प्रकाश राजेघाटगे
बुध – सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला कॉंग्रेस पक्ष पश्चिम महाराष्ट्रात 20 वर्षांपूर्वी आपली मांड व्यवस्थितपणे राखून होता. यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून सातारची ख्याती संपूर्ण देशभर होती.पण 1995 च्या विधानसभेतील सत्तांतरामुळे व नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्हा कॉंग्रेस गलितगात्र झाली. जिल्ह्यात दहा आमदार असलेली कॉंग्रेस नंतरच्या काळात एक किंवा दोन आमदारांच्या पुढे कधीच गेली नाही. अशा हतबल कॉंग्रेसला नवनिर्वाचित प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉं. सुरेश जाधव भविष्यात कोणत्या औषधाने ठणठणीत करणार, हे पाहणे मोठे औसुक्याचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण वगळता जिल्ह्यात कुठेही कॉंग्रेस पक्षाचे चिन्ह नव्हते आणि तसाही कराड दक्षिण कॉंग्रेसचा बाल्लेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे आठपैकी फक्त या एकाच मतदारसंघात पक्षाची बांधणी सध्या तरी व्यवस्थित आहे. पण लगतच्या कराड उत्तरमध्ये परिस्थिती जरा वेगळी आहे. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत दोन नंबरची मते मिळवलेले धैर्यशील कदम शिवसेनेत गेल्यामुळे येथे थोडी गोंधळाची परिस्थिती आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सल्ल्यानुसार धोरण ठरविल्यास कमीत कमी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत कराड उत्तरमध्ये प्रबळ ताकद निर्माण होऊ शकते. पण नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव येथे युवा वर्गाला किती ताकद देतात, यावरच सर्व गणित अवलंबून आहे.
पाटण व कोरेगांव मतदारसंघात अजूनही जुणेजाणते नेते कॉंग्रेसचा एकहाती खांब पकडून आहेत. पाटण मतदारसंघाचा विचार करता श्री. हिंदुराव पाटील यांनी आजपर्यंत किल्ला लढवून ठेवला आहे. आता त्यांना ताकद देण्याची जबाबदारी पृथ्वीराजबाबांकडे असली तरी संघटना मजबूत करायला डॉ. जाधवांचा सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो. तशीच अवस्था कोरेगांव मतदारसंघात आहे.
येथे शिवसेनेचा आमदार निवडून आल्याने अनेक जणांचे पक्षच गुलदस्तात गेले आहेत. पण एक- दोन महिन्यांत अनेकांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार असल्यामुळे भविष्यात अनेक गमतीजमती येथे घडू शकतात. पण डॉक्टरांना येथे मोठ्या भिंगाचा चष्मा घालून काम करावे लागणार आहे. आणि ते याकामी निष्णात आहेत हे खूप कमी लोकांना माहीत आहे. फलटण व माण तालुक्यातील नेतृत्वच भाजपामध्ये गेल्याने येथे कॉंग्रेसमध्ये मोठी पोकळी आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांत भरपूर श्रम घेण्याची तयारी लागणार आहे.
आणि येणारा काळच यावर औषध शोधेल, असे दिसत आहे. सातारा विधानसभेचे राजकारण पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्रित असल्याने येथे पक्षवाढीला मर्यादा आहेत. पण योग्य नियोजन व बेरजेचे राजकारण केल्यास येथे विरोधी पक्षाची जागा कॉंग्रेस घेऊ शकते. तसेच वाई विधानसभेतही सेनापतीविना (मदन भोसले भाजपवासी झाल्याने) तालुका कॉंग्रेसमध्ये गोंधळ आहे. हा गोंधळ शांत करू नवे नेतृत्त्व विकसित केल्यास आजही वाई तालुक्यात पक्षाची स्थिती मजबूत होऊ शकते.
एकंदरीत जिल्हा कॉंग्रेसची सद्यस्थिती ही निद्रिस्त ज्वालामुखीसारखी आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे जिल्हा कॉंग्रेसमध्ये थोडी जान दिसू लागली आहे. त्यात पुसेगावच्या सरपंचपदापासून ते सभापती व विधानसभेचे उमेदवार राहिलेल्या डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. पण राजकारणाची सुरवात ग्रामीण भागातून केलेल्या या नेत्याला पक्षाचे केडर वाढवणारे “टॉनिक’ नक्कीच माहीत असणार हे निश्चित आहे. पण हे टॉंनिक पक्षबांधणी किती लाभदायक ते येणारा काळच ठरवेल.