पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर वनविभागाच्या ढिसाळ कारभाराचा वन्यजीवांना मोठा फटका बसत आहे. ऐन उन्हाळ्यात या मुक्या जीवांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकावे लागत असून, गेल्या पाच वर्षांपासून सुपा गावच्या सरपंच मनिषा रोकडे या मुक्या जीवांची तृष्णा भागवत आहेत.
प्रत्येक वर्षी उन्हाळा येतो, यादरम्यान वन्यजीवांना पाणी लागेल. पाणवठ्यात पाणी सोडले पाहिजे, हे वन अधिकारी विसरूनच जातात. पारनेर तालुक्यात वन्यप्राण्यांसाठी वन विभागाने अनेक गावात पाणवठे तयार केले आहेत. परंतु वन अधिकारी, वन कर्मचारी या पाणवठ्यात पाणी सोडत नाही.
प्रत्येक वर्षी उन्हाळा आला की वन अधिकारी त्या पाणवठ्याची तात्पुर्ती डागडूजी करतात व थोडीफार ओरड झाल्यावर पाणी सोडतात, हे नेहमीचे झाले आहे. पावसाळा व हिवाळ्यात नैसर्गिक स्रोतामुळे या वन्यजीवांना पाणी लागत नाही, परंतु उन्हाळ्यातील चार ते पाच महिने या मुक्या जीवांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असते.
फेब्रुवारी महिना संपला की, उन्हाची तीव्रता जाणवू लागते. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके निघाली की मग या मुक्या प्राण्यांची दडणही संपते. नैसर्गिक जलस्त्रोत आटले किंवा विहिरी, बोअरवेलचे पाणी संपले की हेच प्राणी वाडी-वस्त्यांकडे वळतात. पाण्याच्या शोधात नगर – पुणे महामार्गावर अनेक वेळा या मुक्या प्राण्यांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
वनविभागाच्या वतीने जंगलामध्ये पाणवठे तयार केले तर त्यात पाणी सोडण्यासाठी आर्थिक तरतूद ही केलेली असेलच ना मग वनविभाग या पाणवठ्यात उन्हाळात पाणी सोडण्याची तसदी का घेत नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
सरपंच मनिषा रोकडे व त्यांचे पती योगेश रोकडे यांनी आपली सामाजिक बांधिलकी दाखवत हंगा, शहाजापूर येथील जंगलातील पाणावठ्यात बारा हजार लिटर पाणी सोडून या मुक्या जीवांना मोठा दिलास दिला आहे. सरपंच रोकडे हे गेल्या पाच वर्षापासून या मुक्या जीवांची तहान भागवत आहेत. परंतु वन विभाग यासाठी कायमची तरतूद का करत नाही.
याबाबत वन्यप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावेळी सुपा सरपंच मनिषा रोकडे, माजी उपसरपंच दत्तात्रय पवार, ग्रामपंचायत सदस्य अनिता पवार, पप्पु पवार, पत्रकार मार्तंडराव बुचुडे, सुरेंद्र शिंदे, संतोष ढवळे, कृष्णा कोल्हे, शुभम गायकवाड, स्वराज रोकडे आदी उपस्थित होते.