नाणे मावळ, (वार्ताहर) – मावळ परिसर हा भात पीकासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. त्यात इंद्रायणी तांदळाला जास्त महत्त्व असून मावळातील प्रमुख पीक म्हणून ओळखले जात असतानाच मावळ तालुक्यातील बहुतेक शेतकरी आजही ज्वारीचे पीक घेत असून ज्वारीच्या पिकाला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच यंदा १०० हेक्टरने ज्वारी पिकाच्या लागवडीत वाढ झाली आहे.
एकेकाळी महाराष्ट्रातील प्रमुख पीक म्हणून ज्वारीची ओळख होती. मात्र, गेल्या काही दशकांपासून या पिकाचे अस्तित्वही धूसर झाले आहे. परंतु, मावळ तालुक्यातील बहुतेक शेतकरी आजही ज्वारीची पेरणी करत ज्वारीच्या पिकाला उभारी देण्याचा प्रयत्न करत असून तालुक्यात ज्वारीचे रब्बी पीक ९०३ हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते.
तर, गेल्या काही वर्षांत आरोग्यासाठी तसेच डॉक्टरांनी सांगितले म्हणून ज्वारीच्या भाकरीचा वापर वाढल्याने दरातही मोठी वाढ झाली आहे. पचायला हलका आहार म्हणून डॉक्टर, आहारतज्ज्ञ ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे ब्रेड, बटर, चपातीकडून आता नागरिक पुन्हा ज्वारीच्या भाकरीकडे वळत आहेत. दोन्ही वेळच्या आहारात आता एक वेळ ज्वारी खाल्ली जात आहे. त्यामुळे मागणीही वाढली आहे.
तर, मावळ तालुक्यात ९०३ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जाते. यामध्ये कुठलीही लागवड कमी न होता ती १०० हेक्टरने वाढली असल्याने ज्वारीचे महत्व नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांना पुन्हा समजू लागले आहे.
गेल्या दहा वर्षांत ज्वारी पिकाचे वाढलेले महत्व पहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाला धरून ठेवले आहे. गेल्या पाच वर्षांत ज्वारीच्या पिकाला चांगला बाजारभाव मिळत आहे. जनावरांनाही उन्हाळ्यात कडबा मिळतो. तर, कडब्यालाही बाजारात चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र आणि महत्त्व वाढत आहे. हेच लक्षात घेऊन नाणे मावळ परिसरात प्रगतशील शेतकरी सुनील ढवळे यांनी यंदा शेतामध्ये ज्वारीचे पीक घेतले असून त्याची काढणी केलीआहे.