मुंबई –पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर महंमद शमीच्या निष्ठेबाबत शंका घेत अनेकांनी त्याच्यावर टीका केली. त्यातही टीकेची पातळी खूपच खाली गेल्याचेही स्पष्ट दिसून आले. जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनी शमीला समर्थन देत टीकाकारांवरही ताशेरे ओढले मात्र, या सगळ्याच बीसीसीआयने प्रतिक्रिया देण्यास खूप वेळ लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भारतीय संघाचा एक प्रमुख खेळाडू टीकेचा धनी बनत असताना त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी बीसीसीआयने 48 तासांपेक्षाही जास्त वेळ का घेतला, असा प्रश्न आता अनेक जण विचारत आहेत.
टी-20 विश्नकरंडक स्पर्धेतील लढतीत भारताचा पराभव करत पाकिस्तान संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. यापूर्वी पाकिस्तानने टी-20 विश्वकरंडक स्पर्धांमध्ये भारताला एकदाही पराभूत केले नव्हते, मात्र यावर्षी त्यांनी भारताचा हा विक्रम मोडीत काढला. पराभवानंतर भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर शमीला त्याच्या धर्माच्या आधारावर ट्रोल केले. त्यानंतर आता 48 तासांनी बासीसीआयने शमीच्या समर्थनार्थ एक ट्वीट केले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले होते आणि सामन्यात त्यांना एकही गडी बाद करता आला नाही. तसेच सासत्याने सरस गोलंदाजी करत असलेल्या शमीने सर्वाधिक 43 धावा दिल्या होत्या.
शमीला त्याच्या या खराब प्रदर्शनामुळे ट्रोल केले गेल्यावर क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांनी त्याला समर्थन दिले. पण बीसीसीआयने त्याचे समर्थन करण्यासाठी 48 तासांचा वेळ घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.