नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी कर्जाचे जे पॅकेज जाहीर केले आहे त्याची माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पोलखोल केली आहे. त्यांनी या संबंधात एक उदाहरणही एका ट्विटर संदेशात दिले आहे. लघु व मध्यम उद्योगांना तीन लाख कोटी रूपयांचे बॅंक कर्जाचे पॅकेज दिले जाईल असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
त्या पार्श्वभूमीवर या खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत या उद्योगांची सरकारकडील थकबाकी 5 लाख कोटी रूपयांची आहे असे म्हटले होते. म्हणजे सरकारच या उद्योगांचे पाच लाख कोटी रूपयांचे देणे लागत असेल तर यात कर्जदार कोण आणि कर्ज देणारा कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने या क्षेत्रातील उद्योगांची देणी दिली तरी त्यांना पॅकेज पेक्षा मोठी मदत होईल. हे दोन्ही मंत्री आपसातील वाद मिटवून आणि लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांना स्वत:च स्वत:चा विकास करू देतील काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, अन्य सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडून सरकारला मोठ्या प्रमाणात माल पुरवठा केला जातो.
याची सरकारकडील थकबाकी मोठी आहे. ही थकबाकी या उद्योगांना त्वरीत मिळाली तरी त्यांना या अडचणीच्या काळात मोठी आर्थिक मदत होणार आहे. सरकारकडे असलेल्या या थकबाकीची रक्कम त्यांनी जाहीर केलेल्या तीन लाख कोटी रूपयांच्या कर्जाच्या मदतीपेक्षा अधिक आहे असे चिदंबरम यांनी या ट्विटद्वारे सूचित केले आहे.