मुंबई – राजकारणात थोडे मागे-पुढे चालत असते. मात्र, ते तानाजी सावंत यांचे वैयक्तिक मत असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणावरही अन्याय होवू देणार नाहीत. अफवांवर किती बोलायचे. किती अफवा पसरवल्या जातात. बदनामीचा प्रकार केला जातोय. अधिकृत गोष्टी आल्यावरच आम्ही बोलू, असे शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या संदर्भात काल केलेल्या विधानाच्या अनुशंगाने आदित्य यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरतो आहे. दोन पक्ष जिथे एकमेकांविरोधात लढलोय, तिथे नाराजी असणे स्वाभाविक आहे. वरिष्ठ नेते लक्ष घालतायत. यातूनही मार्ग निघेल. सध्या राजकीय मोर्चेबांधणी पेक्षा आम्ही पर्यावरण, पर्यटन आणि कामावर फोकस दिलेला आहे.
दरम्यान, आपल्यावर अन्याय होत असेल, तर मैत्रीचा विषय येतोच कुठे म्हणत भाजप-शिवसेना युतीच्या चर्चांना आदित्य ठाकरेंनी पूर्णविराम दिला. आदित्य म्हणाले की, सध्या देशासमोरील विषय हे राजकारणापेक्षा महत्त्वाचे आहेत. आपल्यावर अन्याय करत असाल, तर मैत्रीचा विषय येतो कुठे. सध्या बिगर भाजप राज्यात राजकीय षडयंत्र सुरू आहे. आम्ही टक्कर द्यायला सज्ज आहोत. नैराश्यातून सुरू असलेले हे घाणेरडे राजकारण थांबले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच सध्या सुडाचे, बदनामीचे राजकारण सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
येणाऱ्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोघांनीही आकाश-पाताळ एक करत आत्तापासूनच तयारी सुरू केलीय. राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या कुरघोड्याही त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे. यात अनेकदा भाजप-शिवसेना युतीचा मुद्दा अनेकजण उगाळतात. त्याला आज आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.