खालापूर – खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची दुःखद घटना समोर आली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ पथके बचाव कार्य करत आहे. 98 लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे तर 12 जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
इर्शाळवाडी गावातजाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे बचाव कार्य करण्यात अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. मात्र सध्या या दुर्घटनास्थळी पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे बचावकार्यत अडथळे येत आहेत. पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे 50 ते 60 घरांची ही वस्ती आहे. हे ठिकाण इर्शाळगडाच्या पायथ्याशी असून, इर्शाळवाडी ‘इर्शाळगडा’मुळेच प्रसिद्ध आहे. यथे प्रत्येक पावसाळ्यात लोक पर्यटनासाठी येत असतात. येथील निसर्ग देखील अतिशय सुंदर आहे.
मुंबई पुणे जुना महामार्गावर चौक जवळ मोरबे धरण येथे जाण्यासाठी मार्ग आहे. याच मार्गाने पर्यटक इर्शाळगडाच्या पायथ्याला पोहोचतात. किल्ल्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे वर असलेलं नैसर्गिक छिद्र, ज्याला मराठी नेढे किंवा इंग्रजीत ‘नीडल्स आय’ असंही म्हणतात. सामान्य उंचीच्या माणसाला आरपार जात येईल असे हे नेढे आहे.
इर्शाळगडाची उंची 3700 फूट असून पायथा ते किल्ला जाण्यासाठी दोन तासाचा वेळ लागतो. दरम्यान, हा इर्शाळगड हा ट्रेकिंग साठी देखील खूपसं प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळेच हा या ठिकाणी तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
गडाचे सर्वोच्च ठिकाण म्हणजे इर्शाळगड सुळका. मात्र इथपर्यंत जाण्यासाठी कुशल गिर्यारोहण कौशल्य लागते. गडमाथ्यावरून प्रबळगड, माथेरान, चंदेरी मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो. गडावरून पश्चिमेकडे मोरबे धरणाचे छान दृश्य दिसते. इर्शाळगड हा किल्ला नसून खरे तर शिखर आहे.
मे 1666 मध्ये छत्रपती शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला तेव्हा त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक ह्या गावी झाला होता.