मुंबई – 1970 च्या दशकात अमिताभ बच्चन त्याच्या करिअरमधील सर्वोच्च टप्प्यावर होता त्याचे बहुतेक चित्रपट सुपरहिट होत होते. त्याच काळात आपल्यावर पंधरा वर्षे मीडियाने बहिष्कार टाकला होता असे खुद्द अमिताभ बच्चन यांनी सांगितलेले आहे. अमिताभ बच्चन यांना स्टार पद पहिल्यांदा मिळाले ते 1970 मध्ये, त्यांच्या अँग्री यंग मॅन प्रतिमेमुळे. सध्याच्या काळात चित्रपट अभिनेत्यांना ज्या प्रकारची प्रसिद्धी मिळत आहे ते पाहता त्या काळात बच्चन यांच्यावर मीडियाने पूर्णपणे बहिष्कार टाकला होता. 2017 मध्ये अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात ब्लॉगद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
आणीबाणीच्या काळात वर्तमानपत्रांवर बंदी आली होती ती आपल्यामुळेच आली होती असे गृहीत धरून माध्यमाने आपल्यावर बहिष्कार टाकला होता, असे अभिताभ बच्चन यांनी त्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. त्या काळात माध्यमाचा कुठलाही प्रतिनिधी आपली मुलाखत घेत नसे किंवा छायाचित्रे देखील काढली जात नव्हती ते म्हणतात. त्या काळात माझे सर्व चित्रपट सुपरहिट होत होते तरीही माध्यमांनी माझ्यावर बहिष्कारच टाकला होता, असे त्यांनी सांगितले आहे अमिताभ बच्चन म्हणतात, मी जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जात असे किंवा चित्रपटाच्या प्रीमियर साठी जात असे तेव्हा मला पाहताच फोटोग्राफर्स त्यांचे कॅमेरे खाली करत असत.
अगदी चित्रपट विषयक मासिकांमधून माझे नाव छापणे देखील टाळले जात असे. माध्यमाच्या अशा या वागण्यामुळे अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या चित्रपटांच्या सेटवर माध्यमांच्या प्रतिनिधींना येण्यास बंदी घातली होती. अमिताभ बच्चन म्हणतात, त्यावेळी माझ्या बद्दल एक ओळ ही छापली जात नसेल किंवा लिहिली जात नसे, माझ्या कोणत्याही चित्रपटाची प्रसिद्धी केली जात नसे, एवढेच काय माझ्या कुठल्याही कामाचे कौतुक किंवा फोटो देखील छापले जात नसत. ज्या कार्यक्रमाला मी उपस्थित असायचो त्या कार्यक्रमाची छायाचित्रे देखील प्रसिद्ध केली जात नसत.
अशा कार्यक्रमांमध्ये जोपर्यंत मी उपस्थित असे तोपर्यंत फोटोग्राफर त्यांचे कॅमेरे बाजूला ठेवून उभे राहत असत. माझा निषेध म्हणून त्यांनी माझा एकही फोटो काढला नाही. एखाद्या चित्रपटाची माहिती देताना किंवा त्या चित्रपटातील कलाकारांची नावे छापताना ते माझे नाव जाणीवपूर्वक वगळत उदाहरणार्थ नास्तिक या चित्रपटातील कलाकारांची नावे लिहिताना हेमामालिनि आणि प्राण एवढेच लिहिले जात असे. या दोघांच्या मध्ये कंसात स्वल्पविराम ठेवून माझ्याबद्दलचा निषेध नोंदवला जात असे. तो कंसातील स्वल्पविराम म्हणजे मी असायचो.
बच्चन यांनी ब्लॉगमध्ये असे म्हटले आहे, की त्यावेळची माध्यमांची माझ्यावरील बंदी म्हणजे आश्चर्यकारक होती. माझा दिवार चित्रपट सुपरहिट झाला होता आणि त्यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी मात्र संजीव कुमार यांना आंधी चित्रपटासाठी देण्यात आली. त्यावेळी माझ्या प्रतिस्पर्धी असलेल्या अभिनेत्याला ट्रॉफी देण्यासाठी मला पाचारण करण्यात आले होते. अमिताभ बच्चन म्हणतात, त्यावेळचे अनेक समीक्षक आणि माझ्या विरोधातील माध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा माझ्याशी बोलत असत तेव्हा ते सांगत असत, की मी जे काही केले आहे त्यामुळे माझ्या अपमान करण्यासाठी हे सर्व जाणीवपूर्वक करण्यात येत आहे.
मी या सगळ्या गोष्टींकडे कधीच लक्ष दिले नाही. अगदी संजीव कुमारला मी ट्रॉफी देखील प्रदान केली आणि त्याच्या कार्याचा गौरव केला. कारण त्यावेळी गंगा जमुना चित्रपटासाठी दिलीप कुमार यांना अवॉर्ड मिळत नसेल तर माझी काय कथा. अभिताभ यांच्या सांगण्यानुसार, सुमारे पंधरा वर्षे हे चालले होते. नंतर कुली चित्रपटाच्या सेटवर मला गंभीर अपघात झाला त्यावेळी माझ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या आघाडीच्या चित्रपट विषयक मासिकाने देखील माझ्याविषयी सहानुभूतीपूर्वक लिखाण केले होते.
मला त्याचे नंतर आश्चर्य वाटले. मी बरा झाल्यावर त्या मासिकाचे संपादक मला भेटायला आले आणि तो सहानुभूतीपूर्वक लेख का लिहिला होता हे त्यांनी मला सांगितले. हा माझ्यासाठी एक भावनिक क्षण होता. त्या संपादकांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि सचोटीने सांगितले, की आम्ही तुम्हाला नाराज केले, खूप त्रास दिला. कारण तुम्ही देखील मीडियाशी तसेच वागलात. त्यामुळे तुम्ही अपयशी व्हावेत असे आम्हाला वाटत होते.
परंतु तुम्हाला मृत्यू यावा अशी आमची इच्छा नव्हती. त्यामुळेच मी तुमच्याविषयी सहानुभूतीपूर्वक लेख लिहून तुमची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना केली होती. अमिताभ बच्चन म्हणतात, हा माझ्यासाठी भावनिक क्षण होता त्यानंतर माध्यमांशी असलेले माझे नाते हळूहळू पूर्वीप्रमाणेच होत गेले.