सरकार म्हणते ती माहिती अपुरी होती
नवी दिल्ली: भारतातील 121 जणांच्या फोनची इस्त्रायली कंपनीकडून हेरगीरी सुरू असल्याची माहिती आम्ही सप्टेंबर महिन्यातच भारत सरकारला कळवली होती. अशी माहिती व्हॉट्सऍप कंपनीने दिली आहे.
त्यामुळे भारत सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यावर सरकारतर्फे आता सारवासारव सुरू असून आम्हाला व्हॉट्सऍप कडून काही संदेश आला होता पण ती माहिती अपुरी होती असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
व्हॉट्सऍपने म्हटले आहे की या आधी मे महिन्यात पहिल्यांदा आणि त्यानंतर दुसऱ्यांदा सप्टेंबर महिन्यात आम्ही भारतातील व्यक्तींची इस्त्रायली कंपनीकडून हेरगीरी सुरू असल्याची माहिती भारत सरकारला कळवली होती.
इस्त्रायली कंपनीकडून जगभरातील पत्रकार आणि मानवाधिकार संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या फोनवर स्नुपिंग केले जात होते. त्यात भारतातीलही 121 जणांचा समावेश आहे असेही आम्ही त्यांना कळवले होते. पण त्यावर माहिती तंत्रज्ञान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्हाला मिळालेली माहिती अर्धवट आणि अपुरी होती. पण आता आम्ही त्यावर उपाययोजना सुरू केली आहे. त्यांनी त्या अनुषंगाने आता व्हॉट्सऍप कंपनीलाही प्रतिसाद पाठवला आहे पण त्याचा तपशील मात्र व्हॉट्सऍपकडून देण्यात आलेला नाही.