करोना विषाणूच्या महामारीने अवघे जग कवेत घेतले आहे. अत्यंत प्रगत आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा असतानाही अमेरिका, इटलीसारखी राष्ट्रे या महामारीचा सामना करण्यात अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे “सिर सलामत तो पगडी पचास’ अशीच भूमिका घेऊन आपल्या देशातील सर्वांनाच खूप सावधपणे वागावे लागेल.
खास करुन 24 मार्चनंतर आपल्या देशात महामारीने पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली. असे असले तरी जगाच्या तुलनेत आपल्या देशाने करोना विषाणू रोखण्यास बऱ्यापैकी यश मिळविल्याचे दिसते. अर्थात हे केवळ लॉकडाऊन आणि त्याचे नियम पाळणाऱ्यांमुळेच शक्य झाले. आता या लॉकडाऊनचा कंटाळा आल्याची तक्रार सर्वसामान्य नागरीक करत आहेत. मात्र, घरात राहून वैतागलेले बरे. घराबाहेर पडून थेट या आजाराला बळी पडण्याचा धोकाच जास्त आहे, हे विसरून चालणार नाही. शिक्षण क्षेत्राविषयी चिंता व्यक्त होत आहे.
अकरावी आणि बारावी नंतरचे शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची जास्त चिंता आहे. यावर्षीचे शैक्षणिक अभ्यासक्रम कधी सुरु होतील किंवा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे काय, असे प्रश्न आहेत. मात्र, त्या अगोदर सर्वांचा जीव महत्वाचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. करोना आटोक्यात आल्यानंतर शैक्षणिक स्थितीच्या सुधारणेसाठी सरकार योग्य ते निर्णय घेईल. त्याची चिंता करु नये. सर्वांना सारखाच न्याय होईल, हे नक्की.
डॉ. पांडुरंग गायकवाड,संचालक, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, विळद, ता.नगर. संपर्क : 8554990202.
करोना महामारीच्या या संकटात अनेक छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मात्र, आता व्यवसाय सुरु करण्यासाठी काही अंशी आशेचा किरण दिसतो. ग्रीन झोनच्या पट्ट्यात लवकरच काही अटी व शर्तीनुसार सलून व्यावसायिकांना आपले व्यवसाय सुरु करता येतील. तथापि, सर्वाधिक धोका असलेल्या या व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करताना खबरदारी घ्यावी लागेल. त्यात येणाऱ्या ग्राहकाला अगोदर हात स्वच्छ धुण्यासाठी आग्रह करावा. त्यासाठी साबनचा वापर केला, तरी पुरेसा ठरेल. शक्यतो सलूनच्या बाहेरच तात्पुरत्या स्वरूपाचे वॉश बेसीन तयार करावे. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांसाठी किमान तीन फुटांच्या अंतरावर बसण्यासाठी खुर्ची किंवा स्टुल ठेवावा. सर्वच सलून कामगार व मालकांनाही पुढील अनेक महिने मास्क व हातात ग्लोज घालून काम करण्याचीच सक्ती करावी. प्रत्येक ग्राहकाने हात स्वच्छ धुवून घेतल्यानंतरच त्यांचे केस कापावेत. दररोज रात्री काम उरकल्यानंतर आपले दुकान निर्जंतुक करुन घ्यावे. वापरातील सर्वच मशिन, खुर्ची दररोज संध्याकाळी किंवा रात्री डेटॉलसारख्या पाण्याने किंवा सेनिटायजरने स्वच्छ कराव्यात. त्यातही शक्यतो आपल्या नेहमीच्या ग्राहकांनाच प्राधान्य द्यावे. शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन जवळील सलून व्यावसायिकांना जास्तीची काळजी घ्यावी लागेल. त्यांना अत्यंत काळजीपूर्वक काम करावे लागेल. सलुनमधील वापरलेले टॉवेल आणि नॅपकिन घरात धुण्यासाठी नेऊच नयेत. ते बाहेरच निर्जंतुक करावेत.
विकास मदने, राज्य कार्यकारीणी सदस्य, महाराष्ट्र नाभिक, महामंडळ, नगर. संपर्क : 9422353378.