मुंबई :- गत वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महोदयांनी समुद्राचे पाणी मराठवाड्याकडे वळवून दुष्काळ संपवण्याची घोषणा केली होती. हे राजकीय आश्वासन होते बहुदा. कारण या विषयात फार काही ठोस असे झालेले दिसत नाहीत. यातच सरकार दुष्काळ संपवण्यास किती उत्सुक आहे, हे स्पष्ट दिसते, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला फटकारले आहे.
दरम्यान, दानवे पुढे बोलताना म्हणाले की, मराठवाड्याची भूमी दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभी आहे. पावसाची तूट, साधारण 50 दिवस विना पावसाचे राहिल्याने मका, सोयाबीन सारखी पिके संपल्यात जमा आहेत. भर पावसाळ्यात टॅंकरवर निर्भर गावांची संख्या शंभरी पार करणार आहे. त्या सिंधू सागरातील “जगातील सर्वात मोठ्या’ पुतळ्याचे काय झाले? जरा ते पण सांगा लोकांना!
पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी मराठवाडा तहानलेलाच आहे. पहिली पेरणी वाया जाण्याच्या मार्गावर आहे, पन्नास दिवसांपासून पिकांना पाणी नसल्याने त्यांनी माना टाकायला सुरूवात केली आहे.
भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मराठवाड्यातील हे भयावह चित्र म्हणजे हा भाग दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याचे दर्शवतो. मग समुद्राचे पाणी मराठवाड्यात वळवून आणण्याच्या वल्गना करणाऱ्यांचे काय? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.