नाशिक/मुंबई – त्र्यंबकेश्वर मंदिरात 10 ते 12 जणांच्या जमावाने शनिवारी रात्री बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाला होता. या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करावी, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
या घटनेची चौकशी करण्यासाठी फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचेसुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.
नेमके काय घडले?
संदल मिरवणुकीतील 10 ते 12 जणांनी शनिवारी रात्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वारासमोर फुलांची चादर घेऊन आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर धर्मीयांना प्रवेशास मनाई असल्याचे सांगत सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. मात्र तरीही त्या व्यक्तींनी हट्ट कायम ठेवला. त्यामुळे काही वेळ वाद निर्माण झाला. नंतर मिरवणूक पुढे गेली. पोलिसांनी मंदिरासमोरील सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी करून या युवकांना नोटीस बजावली. मात्र कायदा व सुव्यवस्था सुरळीत आहे. पुरोहित संघ, ब्राह्मण महासंघ, मराठा महासंघासह 15 संघटनांनी पोलिसांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.