सातारा -विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खा. उदयनराजे भोसले शनिवारी (दि. 31 ऑक्टोबर) साताऱ्यात एकत्र आले. एकमेकांची विचारपूस करत, एकमेकांना “टेक केअर’ म्हणत दोघांनी दिलखुलास गप्पा मारल्या. माध्यमांना ब्रेकिंग न्यूज मिळाली. कारण गेल्या काही वर्षांत या दोन्ही नेत्यांमधून विस्तव जात नव्हता. एकमेकांवर टोकाची टीका करत असल्याने दोघांमध्ये वितुष्ट वाढले होते. टीकेची भाषा अत्यंत खालच्या पातळीवर जात होती. या दोघांचे सूर पुन्हा कधी जुळतील, असे वाटण्यापलीकडे अवस्था झाली होती; पण राजकारणात काहीही होऊ शकते, याची प्रचिती या दोघांच्या भेटीमुळे आली.
या दोघांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेची ठरली नसती तरच नवल. दोघं भेटले, चांगलं बोलले, बरं झालं… इथपासून ते मनोमीलनापर्यंत चर्चेची गाडी धडकू लागली. दोन्ही नेते राजघराण्यातील. दोघेही महत्त्वाकांक्षी, दोघेही मातबर. दोघांनाही कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ. राज्याच्या राजकारणात दोघेही वजनदार. असे दोन नेते एकमेकांपासून दुरावतात आणि पुन्हा एकत्र येतात, त्यामुळे चर्चा तर होणारच. ती होत राहीलही, प्रश्न असा आहे की, दोघांच्या एकत्र येण्याने राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या राजकारणात काय फरक पडणार? दुसरा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे की, सर्वसामान्य माणसाच्या जगण्यात काय बदल होणार?
इतकी वर्षे भांडल्यानंतर एकदा ते एकत्र आले आणि चांगली भेट झाली, म्हणजे पुन्हा सारे सुरळीत होणार आहे, असेही म्हणता येत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते, हेच ग्रहीत धरावे लागते. पुन्हा मतभेद, पुन्हा जुळवाजुळव, हेच तर राजकारण असते. म्हणूनच ते मनोमीलन औटघटकेचे ठरू नये, अशी अपेक्षा असते. काही काळानंतर मनोमीलनाचे रूपांतर मनोभेदात होत जाते, हे जिल्ह्याने अनेकदा अनुभवलं आहे. त्यामुळे एकूणच राजकारणावरचा परिणाम परिस्थितीजन्यच असेल. दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. राज्यातील सत्तेत एकाचा सहभाग आहे, दुसरा विरोधात आहे. केंद्रीय राजकारणात वेगळी स्थिती आहे.
दोघांची नावे राज्यात चर्चेची ठरत असली तरी दोघांचा प्रभाव लक्षात घेतला तर राज्याच्या राजकारणात फार मोठी उलथापालथ होईल, असे शक्य नाही. ते एकत्र आले तर जिल्ह्याच्या राजकारणातही फारसे बदल संभवत नाहीत. कारण प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक राजकारण्याच्या गढ्या मजबूत आहेत. स्थानिक राजकारणात ते ते नेते आपापली समीकरणे परिस्थितीनुसार जुळवत असतात. जिल्ह्यातील पक्षीय समीकरणही दोघांच्या एकत्र येण्याने फारसे बदलण्यासारखे नाही. आता उरला प्रश्न तो सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा. दोघांच्या एकत्र येण्याने लोकांचे जगणे बदलणार असेल, तर ते स्वागतार्ह आहे. जिल्ह्याचा विकास गतिमान व्हावा आणि सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखद व्हावे, हे स्वप्न पाहणे चुकीचे नाही.
सामान्य जनतेने हे स्वप्न पाहतानाच राजकारणातील कलगीतुरा पाहिला आहे. खालच्या पातळीवरची भाषा वाचून, ऐकून मनोरंजन करून घेतले आहे. ऐकून सोडून देण्याची भूमिका जनतेने सातत्याने घेतली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, गटारांची कामे रूटीन असून ती त्या पद्धतीने होतच असतात. त्यातही अनेक त्रुटी राहत असल्या तरी कामे होत राहतात, हे महत्त्वाचे आहेच, पण आपल्या जिल्ह्याचे स्थान जगाच्या नकाशावर उठावदार होण्यासाठी मोठा विकासकामांची गरज भासते. केवळ हे दोन नेतेच नव्हे तर सर्वच नेतेमंडळींनी तसे प्रयत्न करावेत, ही लोकांची अपेक्षा आहे. जगाशी स्पर्धा करणारे शिक्षण स्थानिक पातळीवर मिळावे, उपजीविकेची साधने निर्माण व्हावीत, असे मोठे प्रकल्प जिल्ह्यात आले तर सर्वांगीण विकासाला गती मिळू शकते, असे सामान्य लोकांना वाटते; पण इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी किती खटाटोप चाललाय, याचे जिवंत उदाहरण समोर आहे. ते प्रत्यक्षात कधी साकारणार याची अजूनही खात्री देता येत नाही.
हे एक उदाहरण असले तरी जिल्ह्याचा पाणीप्रश्न, औद्योगिक विकास व अन्य कितीतरी विषय असे आहेत की, त्यातून सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळू शकतो; परंतु अशा विषयांना गती मिळत नाही, ही खंत सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच आहे. त्यामुळे हे दोन नेते एकत्र आले, एवढेच नव्हे तर सर्वपक्षीय नेते एकत्र आले तरी जिल्ह्याच्या विकासाची दिशा सापडेल, अशी शक्यता दिसत नाही. दोघांच्या एकत्र येण्याने राजकीय गोटात चर्चा होईल; पण सर्वसामान्यांच्या जगण्यात काय बदल होईल, याचे उत्तर मिळण्याची साशंकता आहे, एवढेच खरे.
तिसऱ्या राजांच्या भूमिकेची उत्सुकता
या दोन नेत्यांच्या राजकारणाला तिसरा कंगोरा आहे, तो आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या राजकारणाचा. त्यांचे रामराजेंशी सख्य आहे; परंतु ते आणि उदयनराजे कधी एकत्र येतात तर कधी दुरावतात. रामराजे-उदयनराजे यांच्यातील कलगीतुऱ्यात शिवेंद्रराजे रामराजेंच्या सोबत होते. सातारा पालिकेच्या राजकारणातील घडामोडी लक्षात घेता शिवेंद्रराजेंचे उदयनराजेंशी सध्या तरी मनोभेदच आहेत. आता रामराजे-उदयनराजे भेटीनंतर तिसऱ्या राजांची भूमिका काय असेल, याची उत्सुकता राजकीय गोटात आहे.