“सीएए’च्या मुद्दयावरून अमित शहांनी केले ममता दिदींना लक्ष्य
कोलकाता- नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दंगली भडकावल्या आणि रेल्वेची जाळपोळही केली, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला. “सीएए’विरोधी आंदोलनामुळे राजधानी दिल्ली गेल्या आठवड्याभरापासून धुमसत आहे. “सीएए’विरोधात ममता बॅनर्जी यांनी प्रथमपासूनच जोरदार टीकेची भूमिका घेतली आहे. मात्र त्यांच्या आगपाखड करण्याचा काहीही उपयोग होणार नाही. “सीएए’ त्या थांबवू शकणार नाहीत, असे शहा म्हणाले.
निर्वसितांचे हित डावलण्याचे कारण काय, असे आपल्याला ममता दिदींना विचारावेसे वाटते आहे. तुम्हाला केवळ घुसखोरांची काळजी आहे. निर्वासितांबाबत मात्र दिशाभूल केली जाते आहे. त्यामुळे ते भयभीत झाले आहेत. आपल्या शेजारी देशांमधून धार्मिक छळापोटी हिंदूंना परागंदा व्हावे लागते. बलात्कार, धमक्या आणि हत्यांना सामोरे जावे लागते. त्यांना भारताचे नागरिकत्व मिळू नये का ? असा प्रश्नही शहा यांनी विचारला.
अमित शहांनी स्थानिक महापालिकेसाठी भाजपच्या प्रचाराचा प्रारंभही केला. पुढील विधानसभा निवडणुकीत पक्षाला पश्चिम बंगालमध्ये जबरदस्त विजय मिळणार असल्याचे ते म्हणाले. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपचे डिपॉझिट जप्त होईल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. मात्र भाजपला 18 जागा मिळाल्या. आता 2021च्या विधानसभा निवडणूकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असेही अमित शहा म्हणाले.