विजय शेंडगे
“नाव सोनाबाई आणि हाती कथलाचा वाळा’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. “नावात काय आहे’ असं शेक्सपिअर म्हणतो. परंतु प्रतिभा मगर यांचा “स्टार्च हवंय विचारांना’ हा कवितासंग्रह वाचताना त्यांच्या नावातल्या प्रतिभेचा स्पर्श त्यांच्या कवितेला झाल्याचं दिसतं. समाजाची वैचारिक घसरण होत असताना
काम, क्रोध, ईर्ष्या, लोभ, दंभ, गर्व या विकारांनी मनावर आणि विचारावर ज्या सुरकुत्या पडल्या आहेत त्या घालविण्यासाठी विचारांना स्टार्च करायला हवं, असं त्यांची कविता सांगते. सद्विचारांची, संस्काराची, संस्कृतीची पाठराखण करणारी त्यांची कविता रस्ता चुकलेल्या समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करते.
एकीकडे नव्या पिढीच्या तरुण स्त्रीला ओढणीची गरज वाटत नाही; परंतु “आधुनिक सावित्री’ या कवितेत कवयित्री म्हणते-
काळ बदलला तरी
आम्ही संस्कृती जपतो
काठपदर नेसून
साऱ्या भारीच सजतो
सजणे ही स्त्रीची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. परंतु सजताना आपल्या संस्कृतीचं भान ठेवण्याचा सल्ला त्यांची “आधुनिक सावित्री’ देते.
मुक्तछंद, अष्टाक्षरी, अभंग रचना, लावणी अशा सर्व काव्यप्रकारातील रचना या काव्यसंग्रहात आढळून येतात. निसर्ग, स्त्री शोषण, शेतकऱ्यांची व्यथा, मानवतावाद, प्रेम, भक्तिभाव या विषयाभोवती प्रतिभा मगर यांची कविता रुंजी घालताना दिसते.
विचारवस्र, गोंडस मोह, विहिरींची ओटी असे कल्पनांचे वेगळेपण या कवितेत दिसून येते. संस्कृतीचं, संस्कारांचं भान जपू पाहणारी ही कविता स्त्रियांची व्यथा देखील मांडू पाहते. परंतु स्त्रियांची व्यथा मांडताना ही कविता उगाच थयथयाट करत नाही, आक्रस्ताळी भूमिका घेत नाही.
काळ बदलला, स्त्री शिकली, आधुनिकतेच्या हातात हात देऊन वाटचाल करू लागली; परंतु ही वाटचाल करत असताना चूल ते शेगडी आणि शेगडी ते ओव्हन अशा स्थित्यंतरात तिच्या हाताला बसणाऱ्या चटक्यात मात्र बदल झाला नाही. हे सांगताना कवयित्री म्हणतात-
चूल, शेगडी, ओव्हन
आता नवे रूप घेते
बाईपणाचे चटके
युगे युगे ती सोसते
बाईपणाच्या चटक्याची जाणीव जशी कवयित्रीला आहे तशीच बाप, भाऊ, पती या स्त्री भोवतीच्या नात्यामुळे तिच्या आयुष्याला लाभणारा अर्थ देखील त्यांना जाणवतो. म्हणूनच माप या कवितेत- “थरथरत्या हाताला, धनी देतोय आधार’, असं त्या म्हणतात. तर “भाऊराया’ या कवितेत भावाचं गुणगान गातात.
“भावाच्या संसारावर सौख्याच्या आणि समृद्धीच्या सरी बरसू दे’ अशी देवाला आळवणी करतात. पित्याचे महात्म्य देखील त्यांच्या विविध कवितेत दिसून येते. ही कविता मानवतावादाची पाठराखण करते, संस्कृतीचे मूल्य जपते. हेच या कवितेचं वेगळेपण आहे. ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांची प्रस्तावना, समर्पक मुखपृष्ठ, दर्जेदार निर्मिती या देखील या काव्यसंग्रहाच्या जमेच्या बाजू आहेत.