नवी दिल्ली – घरातून बाहेर पडताच उन्हाचे जोरदार चटके बसत आहेत. कडक उन्हाने उष्णतेचा 122 वर्षाचा रेकाॅर्ड तोडला आहे. दरम्यान, लहान मुले आणि वृद्धांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहान हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
भारतीय हवामान केंद्राचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा यांच्या मते, वायव्य आणि मध्य भारतातील सरासरी कमाल तापमान अनुक्रमे 35.90 अंश सेल्सिअस आणि 37.78 अंश सेल्सिअससह गेल्या 122 वर्षांतील सर्वोच्च आहे. ते म्हणाले की, मार्च आणि एप्रिलमध्ये देशाच्या मध्यवर्ती भागात तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त होते. दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेशमध्ये तापमान सामान्यपेक्षा 4 अंश सेल्सिअस जास्त होते. दिल्लीत 72 वर्षांनंतर दुसऱ्यांदा एवढी उष्णता जाणवत आहे. यापूर्वी 2010 मध्ये सरासरी कमाल तापमान 40.4 अंश होते. तर यावर्षी ते 40.2 अंश सेल्सिअस होते.
येत्या आठवडाभरात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बांदा हे संपूर्ण देशात सर्वाधिक उष्ण होते. येथील तापमान 47.2 अंश सेल्सिअस होते. याशिवाय महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि राजस्थानमधील श्री गंगानगर येथे 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मध्य प्रदेश (खजुराहो) 45.4, दिल्ली (नजफगड) 45.9, हरियाणा (गुडगाव) 45.9, झारखंड (डालटोनगंज) 45.7 अंश सेल्सिअस तापमान होते.
भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेचा कहर कायम राहणार आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेशमध्येही हीच स्थिती राहील. येथे 2मे नंतर पारा जेमतेम एक ते दोन अंशांनी कमी होऊ शकतो. बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्रालाही उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार नाही. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कोठे किती तापमान?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 44 अंशांवर पोहोचेल. गुजरातमध्ये पारा 45 अंशांवर जाईल. दुसरीकडे, मध्य प्रदेशात कमाल तापमान 43 अंश राहण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये पारा 40 अंशांवर पोहोचू शकतो. उत्तर प्रदेशमध्ये किमान तापमान 25 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 44 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये पारा 39 अंश आणि झारखंडमध्ये 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो.
एवढी उष्णता वाढण्याचे कारण काय?
हवामान तज्ज्ञांच्या मतानुसार, यावर्षी एप्रिल महिन्यात अजिबात पाऊस झाला नाही. साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये हलका पाऊस पडत असे, त्यामुळे तापमानात थोडीशी घट होत असे, पण यावेळी तसे झाले नाही. 1 मार्चपासून सरासरीच्या 87 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळेच होळीपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे.