नाशिक :- उत्तर महाराष्ट्र पर्यायाने नाशिक जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी गोदावरी व तापी खोऱ्यातून वाहून जाणारे पश्चिमेचे पाणी अडविण्यासाठी नार-पार प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन खान्देशसह नाशिक, अहमदनगर ही जिल्हे कायमची दुष्काळमुक्त करण्यात येतील. असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नाशिकमधील डोंगरे वसतिगृह मैदान येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पुढील तीन वर्षात नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसाला 12 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
शासनाने मागील वर्षभरात राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्र गुंतवणूकीत भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक बॅंक राज्यातील 10 हजार गावांमध्ये ॲग्री सोसायटी स्थापन करण्यास शासनाला मदत करणार आहे. निओ मेट्रोच्या कामाला ही लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल.
शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. नाशिक येथे आयोजित शासन आपल्या दारी योजनेत शासकीय योजनांच्या लाभाचा कुंभमेळा भरला आहे, असेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.