नवी दिल्ली – देशातील प्रस्तावित समान नागरी कायद्याच्या संबंधात चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला पी चिदंबरम, सलमान खुर्शीद, विवेक तन्खा, केटीएस तुलसी, लोकसभा खासदार मनीष तिवारी, एल हनुमंथय्या आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्यासह वरिष्ठ कॉंग्रेस नेते उपस्थित होते.
जोपर्यंत केंद्र सरकार त्यांचा मसुदा तयार करत नाही तोपर्यंत कॉंग्रेसने या प्रस्तावित कायद्यावर आपली भूमिका मांडण्याचे टाळले आहे. समान नागरी कायदा हा विवाह, वारसा, दत्तक आणि इतर बाबींशी संबंधित कायद्याचा विषय आहे. सध्या विविध धर्मांना त्यांच्या धार्मिक प्रथापरंपरेनुसार या विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
तथापि भारतात अनेक धर्माचे विवाह, वारसा या संबंधातील नियम वेगवेगळे आहेत. त्यामुळे सर्वांना एकच कायदा लागू होंऊ शकत नाही अशी भूमिका काही जणांनी घेतली आहे. सध्या 22 व्या विधी आयोगाने या विषयावर सर्वांच्या हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. त्या सादर करण्याची मुदत काल संपली.