मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यापासून ते महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईपर्यंत शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील भाजपच्या अस्तित्वावरच बोट ठेवले आहे. त्यांनी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरूनच वाढला आहे. कोणी कोणाचे फोटो वापरणे हा गुन्हा नाही, असे म्हणत भाजपला टोला लगावला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावर राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श विरोधीपक्ष नेते म्हणून काम करावे. महाराष्ट्राला आदर्श विरोधी पक्षनेतेपदाची परंपरा आहे. अनेक दिग्गजांनी योग्यरित्या ही जबाबदारी पार पाडली. राज्यात भाजपानेच शिवसेनेचे उमेदवार पाडले, याची माहितीही आमच्याकडे उपलब्ध आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.राज्यात आम्ही जर वेगळे लढलो असतो तर शंभरी गाठली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येकाला ज्या भूमिका मिळाल्या त्या निभवल्या पाहिजेत,असेही ते म्हणाले.
हे बैलगाडी सरकार किंवा ऑटोरिक्षा सरकार असेल तरी कोणाला कमी लेखू नये. आम्ही कोणत्याही परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही कासवाच्या गतीनं जाऊ पण टप्पा पार करू, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. आम्ही कोणावरही व्यक्तीगत टीका करत नाही. आम्ही धोरणांवर टीका करतो. पण काही जणांकडून देशाच्या माजी पंतप्रधानांवरही टीका केली जाते. हा देश गेल्या पाच वर्षांमध्ये उभा राहिला नाही.
गेल्या 60 वर्षांमध्ये करण्यात आलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा देश उभा राहिला आहे. कॉंग्रेसचे देशाच्या विकासात मोलाचे योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आमच्या मनात आदर आहे आणि तो यापुढेही राहिल,असेही त्यांनी स्पष्ट केले. आता कोणीही कोणासाठी दरवाजे उघडू नये. जेव्हा दरवाजे उघडायला हवे होते, तेव्हा ते उघडण्यात आले नाहीत. आता ती वेळ निघून गेली आहे,असेही त्यांनी नमूद केले.