पिंपरी (प्रतिनिधी) – भारतामध्ये एका जुलमी हुकूमशहाचा जन्म झाला आहे. भारताला जर्मनीच्या हिटलरशाही मार्गावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु इतिहास साक्षीदार आहे जेव्हा हुकूमशहा जन्माला येतो तेव्हा भगतसिंग सुद्धा जन्म घेतो. आम आदमी पार्टीचे प्रमुख चार नेत्यांना सरकारने सुडुबुद्धीने अटक केली आहे.
परंतु मोदींना हे माहीत नाहीये की आपचा शेवटचा कार्यकर्ता हा अरविंद केजरीवालच आहे आणि आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला गाडल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना आपच्या शहराध्यक्षा मीना जावळे यांनी व्यक्त केली.
आम आदमी पार्टीचे पक्षप्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरी, मोरवाडी येथे बीजेपीच्या कार्यालयासमोर आप व इंडिया आघाडीच्या घटक पक्षांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी जावळे बोलत होत्या.
या वेळी शिवसेनेचे नेते माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी निषेध नोंदविताना सांगितले की, भारतामधील प्रमुख विरोधी पक्षांमधील एक बुलंद आवाज बंद करायचा असल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. सध्या भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
सर्वेनुसार भाजपाला 150 जागा सुद्धा मिळणे कठीण आहे. त्यामुळे बिथरल्या सारखे भाजपा काम करत आहे. काही दिवसांपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन व आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक त्याच भीतीने केली आहे. आम्ही ह्या घटनेचा निषेध करत आहोत.
या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या डॉ. मनीषा गरुड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सागर चिंचवडे, सीपीएमचे गणेश दराडे, समाजवादी पक्षातर्फे यादव, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम, आपचे राज्य पदाधिकारी चेतन बेंद्रे, मयूर दौंडकर तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे नेते व आपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने या अटकेचा विरोध केला.