Rajasthan Election – राजस्थानमध्ये जवळपास दीड महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची (Rajasthan Election) सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी थंडावली आहे. सत्ताधारी कॉंग्रेसला सत्तेतून खेचण्यासाठी भाजप, तर सत्ता कायम ठेवण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे.
आता राजस्थानमध्ये आज (25 नोव्हेंबर) 200 जागांपैकी 199 जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे, सकाळी 11 वाजेपर्यंत 25 टक्के मतदान झाले आहे.
दरम्यान, आज माध्यमांशी बोलतांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, ‘आम्ही आरोग्याचा अधिकार विधानसभेत मंजूर केला आहे. आम्ही या प्राधिकरणाच्या अंतर्गत लोकांना 50 लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला आहे. बहुतेक लोकांना 50 लाख रुपयांच्या विम्याची गरज नाही, परंतु प्रत्येकाला संरक्षण मिळाले. कॅन्सर सारख्या अनेक आजारांवर आम्ही हा अधिकार लोकांना दिला आहे जेणेकरून त्यांना सहज उपचार मिळावेत. देशात अशी योजना सोडा, जगात कुठेही अशी योजना नाही.’ असेही गेहलोत म्हणाले आहे.
अशोक गहलोत यांनीही मतदान केलं. तसंच राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही मतदान केलं. घराबाहेर पडत मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, या निवडणुकीत एकूण 1862 उमेदवार रिंगणात असून मतदारांची संख्या 5,25,38,105 इतकी आहे. यामध्ये 18-30 वयोगटातील 1,70,99,334 मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी 22,61,008 नवीन मतदार 18-19 वयोगटातील आहेत. कधीच कोणत्याही पक्षाला दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी न देणे ही राजस्थानची परंपरा आहे. पण यंदाच्या निवडणुकीत राजस्थानमधील ही परंपरा लोक मोडीत काढणार की कायम ठेवणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागेल आहे.
कॉंग्रेस सरकारच्या काळात कल्याणकारी योजना, भाजप सत्तेत आल्यापासून देशात महागाई वाढली, पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात जातनिहाय जनगणना करणार, असे आश्वासन कॉंग्रेसकडून देण्यात आले. तर भाजपने कॉंग्रेसच्या कल्याणकारी योजना केवळ कागदोपत्री, लाल डायरी हे कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक आणि कॉंग्रेसमध्ये घराणेशाही या मुद्द्यावर आरोप करण्यात आले. तर भाजपची सत्ता राजस्थानमध्ये आल्यानंतर भ्रष्टाचाराची चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले.