नवी दिल्ली: शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाशी तीव्र मतभेद आहेत मात्र सत्तास्थापनेसाठी आमच्याकडे संख्याबळ नाही, असे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी भेट घेतल्यानंतर पवार बोलत होते. भेटीतील चर्चेचा तपशील लागलीच उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र पवार यांच्या विधानातून शिवसेनेला सोबत घेत सरकार बनवणार की नाही याबाबत संभ्रम कायम राहीला आहे. तर दुसरीकडे ज्याच्याकडे बहुमत असेल तो सरकार बनवेल, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याने राज्यातील सरकारचे गाडे पुढे सरकण्याची शक्यता कमी झाली आहे.
दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना भाजपातील मतभेद लवकरच दूर होतील. असे विधान सोमवारी पुन्हा केले. त्याचवेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जपून विधाने करावीत, असा सल्ला दिला. शिवसेना आणि भाजपामधील तेढ वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यात पुलोदचा नवा प्रयोग साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली.
शिवसेनेने भाजपाशी संबंध तोडल्याचे जाहीर केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय राष्ट्रबादी कॉंग्रेसने घेतला असल्याचे विश्वासनीय सुत्रांकडून समजते. त्यामुळे शिवसेनला पाठींबा देण्याबाबतचा निर्णय झाला असला तरी शरद पवार ते इतक्यात जाहीर करणार नाहीत, असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे.