पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : शहरात पाणी, वाहतुकीसह अनेक प्रश्न गंभीर बनले असून, भविष्यात ते सोडविण्यासाठीच पुणेकरांचा आवाज म्हणून दिल्लीत जाण्यासाठी लोकसभेच्या मैदानात असल्याच्या भावना पुणे लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी व्यक्त केल्या. निमित्त होते पुण्याची राजकीय संस्कृती जोपासणाऱ्या वाडेश्वर कट्टयाचे. बुधवारी सकाळी या कट्टयावर भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ.
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, तसेच मनसेला जय महाराष्ट्र करत पुण्यातून अपक्ष म्हणून लोकसभा लढविण्याची घोषणा केलेले वसंत मोरे हे तीनही उमेदवार उपस्थित होते. माजी महापौर अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे, माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सतीश देसाई आदी या वेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांच्या याद्याही जाहीर करण्यात येत आहेत. अशा स्थितीत राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून, आरोप- प्रत्यारोपांनी वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
अशा स्थितीत उमेदवारांनी एकमेकांवर खालच्या स्तरावर जाऊन आरोप- प्रत्यारोप न करता विकासाच्या आणि पुणेकरांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवावी, या उद्देशाने या कट्टयाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या तीनही नेत्यांनी पुणेकरांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठीच आम्ही निवडणुकीच्या मैदानात असल्याचे सूतेवाच केले.
शहराचा गेल्या दशकभरात वेगाने विकास झाला आहे. मात्र, यापूर्वी शहराचे नियोजन नसल्याने काही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या काही केंद्रशासन, काही राज्यशासन, तर काही महापालिका स्तरावरील आहे. त्यांचा समन्वय साधून त्या सोडविण्यासह शहराचे पुढील ५० वर्षांचे नियोजन करण्याचा उमेदवार म्हणून माझा विचार आहे. – मुरलीधर मोहोळ (भाजप उमेदवार)
शहराच्या अनेक समस्या आहेत. त्या कोणीही सोडविण्याचा विचारच करत नाही. या समस्यांसाठी पुणेकरांचा सक्षम आवाज म्हणून आपण अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहोत. यापूर्वीच्या खासदारांनी शहरासाठी काय करणे अपेक्षित होते आणि काय झाले नाही, याचा अभ्यास आपण केला असून, तो पुणेकरांसमोर मांडणार आहे. – वसंत मोरे (माजी नगरसेवक)
शहरात विकासाच्या नावाखाली काय काय झाले आणि पुण्याला काय मिळाले, हे सर्व पुणेकरांच्या समोर आहे. शहराच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविल्याच गेल्या नाही. या समस्या सोडविण्यासाठीच महाविकास आघाडीने माझ्यावर विश्वास टाकला असून, पुणेकरांचा आवाज म्हणून संसदेत जाणार आहे. केंद्रातही इंडिया आघाडीचीच सत्ता येणार असल्याची खात्री आहे. – रवींद्र धंगेकर (काँग्रेस, उमेदवार)