ग्रामस्थांनी केली टॅंकर सुरू करण्याची मागणी
नायगाव- मागील आठवड्यात पुरंदर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. नायगाव व पिंपरी येथे सुरू असलेले पाण्याचे टॅंकर अचानक बंद करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा टॅंकर सुरू करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने कोणतीही पाहणी न देता अचानक टॅंकर बंद केले आहेत. पुरंदर तालुक्यातील अनेक भागांत पाणी टंचाईची समस्या कायम आहे. काही भागात पाऊस पडत असला तरी तालुक्यातील पूर्व भागात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन या गावांमध्ये तातडीने टॅंकर सुरू करण्याची मागणी टंचाईग्रस्त गावांमधून होत आहे. यासाठी पिंपरीच्या सरपंच मीना शेंडकर व नायगाव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चौंडकर यांनी गटविकास अधिकारी यांना टॅंकर पुन्हा सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहे.
- यापूर्वीही शासनाने सुरू असलेले टॅंकर बंद केले होते. आताही कोणतीही पाहणी न करता टॅंकर बंद केले आहेत. शासनाने टॅंकर बंद करताना तालुक्यात झालेल्या पावसाचा निकष लावू नये. प्रत्यक्ष पाहणी करावी.
मीना शेंडकर, सरपंच पिंपरी