पुणे – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये 9 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा दोन टीएमसीने कमी असल्याने पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. पुणे शहराला दि. 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
खडकवासलासह टेमघर, वरसगाव आणि पानशेत या धरणांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांमध्ये मिळून एकूण 9.91 टक्के म्हणजेच 34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी दि. 4 मे पर्यंत हा साठा 40 टक्के होता. ग्रामीण भागासाठी उन्हाळी हंगामासाठी दि. 11 मार्चपासून सुरू करण्यात आलेले आवर्तन दि. 10 मेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून यातून 6 टीएमसी पाणी दिले जाणार आहे. त्यानंतर दि. 10 जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू केले जाणार आहे. या कालावधीत तीन टीएमसी पाणी दिले जाणार आहे. सलग 90 दिवस खडकवासला प्रकल्पातून पाणी देण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातही सध्या 2.97 टीएमसी म्हणजेच केवळ 34 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येही काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा नियोजन अवघड…
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 9 टीएमसी पाणी शिल्लक आहे. यातील पाच ते साडेपाच टीएमसी पाणी उन्हाळी सिंचन आवर्तनासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला सोडले जाणार आहे. पालिकेला प्रतिमहिना सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यातही धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीगळती, पाणीचोरी आणि पाऊस लांबल्यास नियोजनानुसार काही पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. उपनगरांतूनही पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पालिकेला अधिक पाणी घ्यावे लागत आहे. यामुळे उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जलसंपदा विभागाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन अवघड जाणार आहे.