पुणे – यंदाच्या मान्सूनवर एल निनोचे संकट असल्याने, पाऊस कमी झाल्यास पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पिण्यासाठीचे पाणी यंदा 15 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याबाबत महापालिका आणि पाटबंधारे विभागात प्राथमिक चर्चा झाली आहे. याबाबतचा अंतीम निर्णय लवकरच होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, या चारही धरणांमध्ये सुमारे 16.75 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे, दरवर्षी 30 जूनपर्यंत राखीव ठेवण्यात येणारा पाणीसाठा 15 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवायचा असल्यास महापालिकेस यासाठी काही प्रमाणात शहरात पाणीकपातही करावी लागणार आहे. या बैठकीत पालिकेच्या पाणी बिलांच्या थकबाकीवरही चर्चा करण्यात आली, पालिकेने आपले म्हणणे लेखी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांच्यासह पालिका तसेच पाटबंधारे विभागाने इतर अधिकारीही उपस्थित होते.
जून अखेरीस स्थिती स्पष्ट
राज्यात मान्सून जूनच्या पहिल्याच आठवड्यात हजेरी लावत असला तरी प्रत्यक्षात खडकवासला धरणसाखळी पाणलोट प्रकल्पात पावसाला एक महिना उशीरा म्हणजे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरूवात होते. त्यानंतर ही धरणे सुमारे 30 ते 40 टक्के भरतात तर त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ही चारही धरणे 100 टक्के भरतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत महिनाभर पाऊस उशीरा सुरू होत असल्याने या दोन्ही विभागांनी पाणीसाठा 15 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्यासाठी आढावा घेतला असल्याचे सांगण्यात आले.
…तर 10 ते
20 टक्के कपात
महापालिकेच्या दैनंदिन पाणी वापराचा विचार केल्यास ऑगस्ट अखेर पर्यत 7 ते 8 टीएमसी पाण्याची गरज असणार आहे. तर शेतीसाठी एक आर्वतन सुरू असून आणखी एक उन्हाळी आवर्तनही द्यायचे आहे. यासाठी जवळपास 7 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तसेच उन्हाळा तीव्र असल्याने पाण्याचे होणारे बाष्पीभवन, जिल्ह्यांतील सिंचन योजना या सर्वांचा विचार करता धरणातील पाणी कमी पडणार आहे. परिणामी, महापालिकेस शहरात धरणातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन उन्हाळ्यात 10 ते 20 टक्के पाणीकपात करावी लागू शकते. मात्र, ही केवळ प्राथमिक चर्चा असून जून महिन्यातील पावसाचे चित्र लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.