आठ वर्षांपूर्वी फुटल्यानंतर लक्ष न दिल्याने अस्तित्वच नष्ट
पेठ – येथील वलखेडवस्तीवरील पाझर तलाव हा येथील वस्तीवरील व इतर 200 कुटुंबातील शेतकऱ्यांना असलेल्या या वस्तीसाठी पिण्याच्या पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध होता. पण अनेक वर्षांपासून मातीचा तलाव फुटून गेला. साधारण 8 वर्षे पुर्वी अतिवृष्टीमुळे तलावाची भिंत मधोमध फुटली. त्यामुळे तलावात एक थेंब ही पाणी साचत नाही. परिणामी वलखेडवस्तीवर पाण्याची भीषणटंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय होत आहे. तर येथे तलाव होता का? अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.
प्रशासनाला लेखी अर्ज, विनंत्या, एकमताने ठराव मंजूर करुनही आजपर्यंत कुणीही दखल घेतली नाही. तलावाची भिंत फुटल्याने परिसरातील विहीरी, विंधन विहिरीची भूजल पातळी लक्षणीय खालावली आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. संबंधित प्रशासनाने तलाव दुरुस्ती न केल्यास परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय
गेल्या 8 वर्षांपासून कुठल्याही प्रकारची दुरुस्ती न केल्याने तलावात व भिंतीवर छोटीमोठी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून याठिकाणी तलाव होता की नाही हा प्रश्न निर्माण झाल आहे. तलाव दुरुस्ती झाल्यास उन्हाळयात शेतकऱ्यांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल. तसेच ज्वारी सारख्या रब्बी पिकाला पाणी देता येईल. परिणामी नागरिकांचे जिवनमान उंचावेल.तलावाच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख दिलीप पवळे यांनी केली आहे.