आवडे देवासी तो ऐका प्रकार।।
नामाचा उच्चार राञंदिवस।।
तुळशीमाळ गळा गोपीचंद टिळा।।
ह्रदयी कळवळा वैष्णवांचा।।
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी।।
साधन निर्धारी आण नाही।।
एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम।।
तो देवा परम पूज्य जगी।।
तुळस ही वनस्पती वारकरी संप्रदायात अतिशय महत्त्वाची मानली जाते.
प्रत्येक वारकऱ्याच्या घरासमोर तुळस असते. वारीत महिला डोक्यावर तुळस घेऊन चालताना दिसतात. वरील अभंगात संत एकनाथ महाराज तुळशीचे महत्व सांगतात. वारकरी संप्रदायिक, अध्यात्मिक महत्त्वासह आरोग्याच्या दृष्टीनेही खूप महत्त्व आहे. केवळ तिच्या सान्निध्यात आरोग्यपूर्ण जीवन मिळते, असे आयुर्वेद सांगते. घराच्या अंगणात असलेल्या या तुळशीच्या झाडामुळे वातावरण शुद्धी होते, सकाळ- संध्याकाळ तिच्या सान्निध्यात राहून तिची पूजा करण्याला आपल्याकडे महत्त्वाचे स्थान आहे आणि म्हणूनच संतांच्या पालख्या पंढरपूरला जाताना दिंडीतील काही महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालताना दिसतात.
वारी सोहळ्यातील तुळशीचे आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्वही तितकेच परिपूर्ण आहे. तुळस ही विठ्ठलाला अत्यंत प्रिय असल्याचे विविध संतांनी अनेक अभंगामधून स्पष्ट केले आहे.असंख्य लोकांचा समुदाय पंढरपूरच्या दिशेने जात असतो. या काळात उन, पाऊस आणि बदलत्या वातावरणाला सामोरे जावे लागते. एकाच ठिकाणी लाखो लोकांचा समुदाय असतो. अश्यावेळी अशुद्ध झालेल्या वायुचे शुद्धीकरण करण्याचे कार्य ही वनस्पती करते. तुळशीमध्ये जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत. वातावरणातील दूषितपणा कमी करण्यास तुळस फायदेशीर ठरते.
वारीचा काळ हा साधारणपणे पावसाळ्याचा असतो. या काळात सर्दी-खोकल्यासारखे आजार बळावतात. वारीच्या मार्गावर अनेकवेळा दूषित अन्न-पाण्याचे सेवन केले गेले तर पोटाचे आजार होतात. याचबरोबर काही वेळा तीव्र उन्हाचा त्रासही सहन करावा लागतो. चालताना पायांना जखमा होतात किंवा थकवा जाणवतो. अशा वेळी तुळशीच्या एका पानाच्या सेवनानेही आजाराला उतार मिळतो. तसेच ती श्री विठ्ठलाला अत्यंत प्रियही असल्यामुळे वारीत तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालतात, असे सांगितले जाते. तुळशीचे पान टाकलेले पाणी पिल्यास आरोग्यवर्धक ठरते. त्यामुळेच वारीत तुळशी वृंदावन असते आणि त्याचबरोबर पाण्याच्या घागरी डोक्यावर घेतलेल्या महिला असतात. या पाण्यात तुळशीचे पान टाकून हे पाणी पितात. तसेच तुळस ही एकमेव अशी वनस्पती आहे जी दिवसातले वीस तास ऑक्सिजन उत्सर्जित करते.
वारीमार्गावरील मुक्कामात तुळशीचा उपयोग
अनेक वेळा वारकऱ्यांना सोहळ्यात ग्रामीण भागात शेतात- शाळांमध्ये किंवा उघड्यावर राहावे लागते. डास-मच्छर यांचा सामना करावा लागतो. काही वेळा मधमाशी दंशासारख्या घटना घडतात. अशावेळी तुळशीतली माती वापरल्यास आराम पडतो. कीडा, मुंगी अगर डास चावल्यास तुळशीची 4-5 पाने धुऊन तळहातावर चोळून दंशाच्या जागी लावतात. त्याने दाह थांबतो. तुळस मोठ्या प्रमाणात प्राणवायू उत्सर्जित करते. हवा, पाणी शुद्ध होते. तसेच धार्मिक ग्रंथामध्येही विशेष महत्त्व वर्णीलेले आहे. दरवर्षी देशात तुळसी विवाह हा उत्सव साजरा होताना पाहायला मिळतो. त्यातून आध्यात्मिक महत्त्व दिसून येते.